अ‍ॅपशहर

एसटी संपात सहभागी झालेल्या 'त्या' ७३ हजार कर्मचाऱ्यांना मोठा फटका

एसटी महामंडळाने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार खात्यात जमा केला. पण जितके दिवस काम, तितके दाम या धोरणानुसार, संपात सहभागी झालेल्या राज्यातील ७३ हजार कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यात आलेला नाही.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 8 Dec 2021, 11:21 am

हायलाइट्स:

  • एसटी महामंडळाने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार केला जमा
  • जितके दिवस काम, तितके दिवस दाम या तत्त्वानुसार पगार
  • संपात सहभागी असलेल्या राज्यातील ७३ हजार कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार नाही
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम एसटी संपात सहभागी झालेल्या ७३ हजार कर्मचाऱ्यांना फटका; पूर्ण पगार नाहीच
म. टा. प्रतिनिधी, मुंबई:
नव्या सुधारित वेतन धोरणानुसार एसटी महामंडळाने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मंगळवारी त्यांचा पगार जमा केला. मुंबई विभागातील १,६७२ एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला आहे. जितके दिवस काम, तितके दिवस दाम या तत्त्वानुसार पगार देण्यात आल्याने संपात सहभागी असलेल्या राज्यातील ७३ हजार कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळालेला नाही.

सेवाज्येष्ठतेप्रमाणे पगारवाढ नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कमी-अधिक वाढ झाली आहे. यामुळे आठ ते नऊ वर्षे काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार १२ ते १३ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अधिक आहे. परिणामी राज्यातील सर्वच विभागांतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक कर्मचारी या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करून यावर तोडगा काढण्यासाठी आग्रही आहेत. आधीच चालक-वाहक मोठ्या प्रमाणात संपात सहभागी आहेत, त्यातच पगारवाढीनंतर आता नवीन गोंधळ निर्माण झाला आहे.

मुंबई विभागातील हजेरीपटानुसार एकूण कर्मचारी संख्या १,७२२ इतकी आहे. यात चालक-वाहकांची संख्या १,०५३ इतकी आहे. सध्या १,०३१ कर्मचारी संपात सहभागी असून ४४५ कर्मचारी कामावर हजर आहेत. काही कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार, तर काही कर्मचाऱ्यांना अंशतः पगार देण्यात आला आहे. एकही दिवस हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आलेला नाही, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी असल्याने एक ते १० वर्षांमधील कर्मचाऱ्यांना पाच हजार, ११ ते २० वर्षांमधील कर्मचाऱ्यांना चार हजार आणि २१ ते ३० वर्षांदरम्यान अडीच हजार रुपये अशी वाढ देण्यात आली आहे. ही पगारवाढ मूळ पगारामध्ये आहे.

मंगळवारअखेर राज्यातील ९२,२६६ कर्मचाऱ्यांपैकी ७२,२७१ कर्मचाऱ्यांनी संपात राहण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. ४,३५९ चालक-वाहकांसह एकूण १९,९९५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत २५०पैकी १२३ आगारांमध्ये वाहतूक सुरू झाली आहे, असा दावा एसटी महामंडळाने केला.

आता चौकशीचा ससेमिरा

पगारवाढीनंतरही संपात सहभाग घेतलेल्या तसेच योग्य कारणाशिवाय सुट्टी घेणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची विभाग नियंत्रकांकडून चौकशी करण्यात येणार आहे. निलंबन, बडतर्फी, बदली, मेस्माचा धाक, निवृत्ती वेतन रोखण्याची धमकी या प्रकारांनंतर आता विभागीय चौकशीचा ससेमिरा संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे लावण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाचे लेख