म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलेला व विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सर्व पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहून संमत केलेला शोकप्रस्ताव बुधवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अटलजींच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य व जावई रंजन भट्टाचार्य यांना प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केला. आजपर्यंत असा शोकप्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कुटुंबीयांना टपालाने पाठविला जायचा. प्रथमच शोकप्रस्ताव प्रत्यक्ष कुटुंबीयांच्या हातात सुपूर्द करण्यात आला.
वाजपेयी यांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहणारा शोकप्रस्ताव सादर केला. त्यावेळी सदर प्रस्ताव टपालाने न पाठविता कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून देण्याची सूचना शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी केली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत अधिवेशनप्रसंगी सर्व पक्षांच्या नेत्यांनी अटलजींच्या जीवनकार्याचा गौरव करणारी भाषणे करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. दोन्ही सभागृहांतील सर्व नेत्यांच्या भाषणांचा शोकप्रस्ताव बुधवारी तावडे यांनी अटलजींच्या कुटुंबीयांना मुंबईत सादर केला. याप्रसंगी राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे व आमदार आशीष शेलार उपस्थित होते. सुमारे तासभराच्या भेटीमध्ये अटलजींच्या महाराष्ट्र व मुंबईतील अनेक आठवणी नमिता यांनी जागवल्या. याप्रसंगी जावई रंजन भट्टाचार्य उपस्थित होते. 'नीतीमूल्य जपणाऱ्या राजकारणाचा अटलजींचा वारसा आजची नवीन पिढी नक्कीच पुढे नेईल', असा विश्वास नमिता भट्टाचार्य यांनी व्यक्त केला.