म. टा. प्रतिनिधी, मुंबई
स्पाइसजेट विमानाच्या अपघातामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री बंद पडली. ती बुधवार रात्रीपर्यंतदेखील सुरू झाली नव्हती. ५० तासांहून अधिक काळ मुख्य धावपट्टी बंद राहिल्याने सोमवारी दीडशे उड्डाणे रद्द झाली आहेत.
सोमवारी रात्री धो-धो पाऊस सुरू असताना स्पाइसजेटचे जयपूर-मुंबई हे विमान धावपट्टीवरून घसरले. मध्यरात्री १२.२० वाजता ही घटना घडली. त्यानंतर ही धावपट्टी बंद करण्यात आली. या विमानाचे 'नोज व्हील'(समोरील चाक) धावपट्टीच्या टोकाशी चिखलात रुतले होते. विमानाला धक्का न लावता हे चाक बाहेर काढणे स्पाइसजेटच्या अभियंत्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे एअर इंडियाच्या चमूला पाचारण करण्यात आले. एअर इंडियाच्या अभियंत्यांनी मंगळवार दुपारपासून ते बुधवारी दुपारपर्यंत अखंड काम करून चाक अखेर सुखरूप बाहेर काढले. 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आम्ही बुधवारी दुपारी २ वाजताच विमान चिखलातून बाहेर काढले. हे विमान धावपट्टीवर आणून ठेवले आहे. आता ते विमान सुरक्षितस्थळी नेण्याचे काम एअर इंडियाचे नाही', असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
विमानतळाची मुख्य धावपट्टी वास्तवात बुधवारी सकाळी साडे सहा वाजताच सुरू होणे अपेक्षित होते. विमानतळ प्रशासनाने तशी सूचना (नोटम) जगभरातील वैमानिकांना दिली होती. पण त्यानंतर ही वेळ बुधवार सायंकाळी साडेसहापर्यंत व पुन्हा गुरूवार सकाळी साडेसहापर्यंत वाढविण्यात आली. यादरम्यान लहान आकाराच्या व 'जोखीमयुक्त'श्रेणीतील पर्यायी धावपट्टीचा वापर केला जात असल्याने विमान वाहतुकीवर परिणाम झाला. मंगळवारी दिवसभरात १५१ विमाने रद्द झाली, बुधवारीदेखील ७५ विमाने रद्द करावी लागली. त्यामध्ये ४० येणाऱ्या व ३५ जाणाऱ्या विमानांचा समावेश होता. १०० हून अधिक विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या. विमानतळाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.
--------------------
'एअर बॅग'तंत्रज्ञानाचा वापर
हे काम 'एअर बॅग'तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आले. विमानाचे पुढील चाक अत्यंत महत्त्वाचे असते. त्याला धक्का लागल्यास अथवा खराब झाल्यास दुरुस्ती अत्यंत खर्चिक असते. नेमके हेच चाक चिखलात रुतले होते. एअर इंडियाच्या अभियंत्यांने या चाकाखाली हवेच्या पिशव्या टाकल्या. त्याद्वारे चाकाला मऊ आधार मिळाल्यानंतर ते बाहेर काढता आले. या कामासाठी २४ तासांहून अधिक काळ लागला.