म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
नाट्यकलेचा ध्यास घेऊन 'एकला नयनाला विषय तो झाला' अशी रंगभूमीची पाच दशकांहून अधिक काळ सेवा करणाऱ्या, संगीत रंगभूमीवर निस्सिम प्रेम करत 'खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी' या न्यायाने रसिकरंजन करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी आणि ९८व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी मटा संवादच्या माध्यमातून श्रोत्यांपुढे मनीचे गुज मंगळवारी येथे सांगितले. केवळ संगीत रंगभूमीच नव्हे, तर संपूर्ण रंगभूमी हेच माझे जीवनध्येय आहे, असे त्या म्हणाल्या. दादर येथे राजा शिवाजी विद्यालय संकुलातील बी. एन. वैद्य सभागृहात कीर्तीताईंसमवेत गप्पांची मैफल चांगलीच रंगली.
कीर्तीताई म्हणाल्या, 'नाटक प्रत्यक्ष अनुभवणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मराठी माणसाचे नाटकावर प्रेम आहे. या नाटकवेड्या प्रेक्षकाची केवळ संगीत नाटकाचीच नव्हे, तर सर्व प्रकारची नाट्यविषयक जाणीव समृद्ध करणे मला आवश्यक वाटते.' आगामी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद ही जबाबदारी असल्याची जाणीव व्यक्त करत त्यांनी या संधीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले, 'नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद ही समग्र रंगभूमीचा एकत्रित विचार करण्याची संधी आहे. रंगभूमी मग ती संगीत रंगभूमी असो, बालरंगभूमी असो की हौशी रंगभूमी असो, या प्रत्येकाबद्दल विचारमंथन व्हायला नाट्यसंमेन ही पर्वणी असते.'
संगीत नाटकालाच आपला श्वास मानणाऱ्या कीर्ती शिलेदार यांची संगीत कहाणी गप्पांमधून उलगडत गेली. संगीत सौभद्र, स्वयंवर, शारदा, स्वरसम्राज्ञी यांसारख्या अनेक नाटकांतील व्यक्तिरेखा आपल्या कसदार अभिनयाने आणि गानकौशल्याने अजरामर करणाऱ्या कीर्तीताईंनी त्यांच्या कारकीर्दीतील सुर्वणक्षण गप्पांच्या ओघात सुरांच्या लकेरी पेरत रसिकांना दिले.
आजचे संगीत कसे आहे? हा प्रश्न त्यांना विचारला गेला नसता तरच नवल. त्यावर त्या म्हणाल्या, 'अभिजात भारतीय संगीत हे मनाला स्थैर्य, उभारी आणि शांती देणारे संगीत आहे. आपले संगीत हे चिरकाल टिकणारे आहे.' संगीत नाटकांचे वैशिष्ट्य सांगताना त्यांनी स्वरविलास कितीही चांगला असला तरी रसनिष्पत्ती करत गायलेले गाणे अधिक खोलवर रुजते. आज कर्णकर्कश, कानठळ्या बसवणाऱ्या पाश्चात्त्य संगीताचा जोर वाढला आहे. त्याने बहिरेपण येईल की काय अशी भीती वाटते. या सगळ्या गदारोळात भारतीय संगीत मनातील अस्वस्थता, चंचलता दूर करेल. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले संगीत आपल्याला भानावर आणेल, त्याचे कर्णमाधुर्य मनाला आनंद देईल.' हा आनंद धकाधकीच्या जीवनात जपून ठेवायचा असेल, तर ही संगीतपरंपरा आपण जपायला हवी, तो वारसा आपण पुढे न्यायला हवा, असेही आग्रही मत त्यांनी मांडले.
संगीत रंगभूमीचे पुढे काय होणार, ही रंगभूमी कोमेजून जाईल की काय, अशी भीती वरचेवर व्यक्त केली जाते. मात्र ही भीती वृथा असल्याचे सांगून शिलेदार यांनी नव्याचा स्वीकार करत संगीत नाटकांची जपणूक करायला हवी, असे आग्रही मत व्यक्त केले. महाराष्ट्राला संगीत नाटकांची परंपरा आहे. जिथे भेसळ असते ते टिकत नाही. मात्र जे अभिजात असते त्याला कधीही मरण नसते. ते टिकावं म्हणून दर्दी रसिक, कलावंत त्याच्या शोधात पुढे येतो. त्यात प्रयोगशीलता आणतो. संगीत नाटकाबद्दलही असे प्रयोग दमदार कलावंत करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची ही परंपरा लोप पावणार नाही तर अधिक लखलखत्या हिऱ्यासारखी झळाळून निघेल, या त्यांच्या विश्वासाला रसिक श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांनी दाद दिली.
नाट्यकलेचा ध्यास घेऊन 'एकला नयनाला विषय तो झाला' अशी रंगभूमीची पाच दशकांहून अधिक काळ सेवा करणाऱ्या, संगीत रंगभूमीवर निस्सिम प्रेम करत 'खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी' या न्यायाने रसिकरंजन करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी आणि ९८व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी मटा संवादच्या माध्यमातून श्रोत्यांपुढे मनीचे गुज मंगळवारी येथे सांगितले. केवळ संगीत रंगभूमीच नव्हे, तर संपूर्ण रंगभूमी हेच माझे जीवनध्येय आहे, असे त्या म्हणाल्या. दादर येथे राजा शिवाजी विद्यालय संकुलातील बी. एन. वैद्य सभागृहात कीर्तीताईंसमवेत गप्पांची मैफल चांगलीच रंगली.
कीर्तीताई म्हणाल्या, 'नाटक प्रत्यक्ष अनुभवणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मराठी माणसाचे नाटकावर प्रेम आहे. या नाटकवेड्या प्रेक्षकाची केवळ संगीत नाटकाचीच नव्हे, तर सर्व प्रकारची नाट्यविषयक जाणीव समृद्ध करणे मला आवश्यक वाटते.' आगामी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद ही जबाबदारी असल्याची जाणीव व्यक्त करत त्यांनी या संधीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले, 'नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद ही समग्र रंगभूमीचा एकत्रित विचार करण्याची संधी आहे. रंगभूमी मग ती संगीत रंगभूमी असो, बालरंगभूमी असो की हौशी रंगभूमी असो, या प्रत्येकाबद्दल विचारमंथन व्हायला नाट्यसंमेन ही पर्वणी असते.'
संगीत नाटकालाच आपला श्वास मानणाऱ्या कीर्ती शिलेदार यांची संगीत कहाणी गप्पांमधून उलगडत गेली. संगीत सौभद्र, स्वयंवर, शारदा, स्वरसम्राज्ञी यांसारख्या अनेक नाटकांतील व्यक्तिरेखा आपल्या कसदार अभिनयाने आणि गानकौशल्याने अजरामर करणाऱ्या कीर्तीताईंनी त्यांच्या कारकीर्दीतील सुर्वणक्षण गप्पांच्या ओघात सुरांच्या लकेरी पेरत रसिकांना दिले.
आजचे संगीत कसे आहे? हा प्रश्न त्यांना विचारला गेला नसता तरच नवल. त्यावर त्या म्हणाल्या, 'अभिजात भारतीय संगीत हे मनाला स्थैर्य, उभारी आणि शांती देणारे संगीत आहे. आपले संगीत हे चिरकाल टिकणारे आहे.' संगीत नाटकांचे वैशिष्ट्य सांगताना त्यांनी स्वरविलास कितीही चांगला असला तरी रसनिष्पत्ती करत गायलेले गाणे अधिक खोलवर रुजते. आज कर्णकर्कश, कानठळ्या बसवणाऱ्या पाश्चात्त्य संगीताचा जोर वाढला आहे. त्याने बहिरेपण येईल की काय अशी भीती वाटते. या सगळ्या गदारोळात भारतीय संगीत मनातील अस्वस्थता, चंचलता दूर करेल. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले संगीत आपल्याला भानावर आणेल, त्याचे कर्णमाधुर्य मनाला आनंद देईल.' हा आनंद धकाधकीच्या जीवनात जपून ठेवायचा असेल, तर ही संगीतपरंपरा आपण जपायला हवी, तो वारसा आपण पुढे न्यायला हवा, असेही आग्रही मत त्यांनी मांडले.
संगीत रंगभूमीचे पुढे काय होणार, ही रंगभूमी कोमेजून जाईल की काय, अशी भीती वरचेवर व्यक्त केली जाते. मात्र ही भीती वृथा असल्याचे सांगून शिलेदार यांनी नव्याचा स्वीकार करत संगीत नाटकांची जपणूक करायला हवी, असे आग्रही मत व्यक्त केले. महाराष्ट्राला संगीत नाटकांची परंपरा आहे. जिथे भेसळ असते ते टिकत नाही. मात्र जे अभिजात असते त्याला कधीही मरण नसते. ते टिकावं म्हणून दर्दी रसिक, कलावंत त्याच्या शोधात पुढे येतो. त्यात प्रयोगशीलता आणतो. संगीत नाटकाबद्दलही असे प्रयोग दमदार कलावंत करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची ही परंपरा लोप पावणार नाही तर अधिक लखलखत्या हिऱ्यासारखी झळाळून निघेल, या त्यांच्या विश्वासाला रसिक श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांनी दाद दिली.