बंदचे पडसाद रुग्णालय सेवेवर संमिश्र असल्याचे दिसून आले. सार्वजनिक रुग्णालयांमधील ओपीडी सुरू असली तरीही रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी काहीजणांना त्रास झाला. केईएम रुग्णालयामध्ये ओपीडीच्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे जाणवले. रोजच्यापेक्षा यातील बाह्यरुग्ण विभागात २० टक्के रुग्णसंख्या कमी झाली होती. जेजे रुग्णालयामध्ये ओपीडी सुरळीत चालल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले. नायर व लो. टिळक रुग्णालयांमध्ये भारत बंदचा प्रभाव जावणला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. या ठिकाणी आलेल्या काही रुग्णांकडे काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून 'कुठे जात आहात?' अशी विचारणा करण्यात आली. चेंबूर, घाटकोपर, माहीम येथून वाहन न मिळाल्याने रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाल्याचे लो. टिळक व केईएममध्ये उपचारासाठी आलेल्या उषा पाटील, नवनाथ पांडे, ज्योती पवार या रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. मुंबईत काही ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत नियमित रुग्णसेवा बंद ठेवण्यात आली होती त्यानंतर ती सुरू झाली. अत्यावश्यक सेवा सुरू राहिल्या. मात्र, बंदचा फारसा परिणाम वैद्यकीय सेवांवर न झाल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. जयेश लेले यांनी व्यक्त केले. पूर्व उपनगरातील औषधांची दुकाने काही ठिकाणी दुपारी दोन वाजेपर्यंत बंद होती, मात्र पश्चिम उपनगरामध्ये ही सेवा सुरळीत सुरू होती. या आंदोलनकर्त्यांपैकी कोणतीही जखमी व्यक्ती रुग्णालयात आली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
वैद्यकीय सेवाही सुरळीत
बंदचे पडसाद रुग्णालय सेवेवर संमिश्र असल्याचे दिसून आले...
Maharashtra Times 11 Sep 2018, 4:00 am