अ‍ॅपशहर

दादर चौपाटीवर मेडिकल कचरा

समाजाचे आपण काही देणे लागतो, ही जाणीव होणे फार महत्त्वाचे असते. हेच लक्षात घेऊन गेल्या १३ महिन्यांपासून प्रत्येक रविवारी 'जय फाऊंडेशन' हा ग्रुप काम करतो आहे. जय शृंगारपुरे आणि त्याचे सहकारी दादर चौपाटी आणि त्यालगतचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.

Maharashtra Times 23 Apr 2018, 5:29 am
अजय उभारे, कॉलेज क्लब रिर्पोटर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम medical-waste


समाजाचे आपण काही देणे लागतो, ही जाणीव होणे फार महत्त्वाचे असते. हेच लक्षात घेऊन गेल्या १३ महिन्यांपासून प्रत्येक रविवारी 'जय फाऊंडेशन' हा ग्रुप काम करतो आहे. जय शृंगारपुरे आणि त्याचे सहकारी दादर चौपाटी आणि त्यालगतचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. पण, शनिवारी दादर चौपाटीच्या सफाईदरम्यान एक धक्कादायक गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली. हॉस्पिटलमधील वापरानंतरची टाकाऊ इंजेक्शने आणि सुया, मास्क, औषधांच्या बाटल्या, आय. व्ही. पाइप्स आणि इतर अनेक प्रकारचा मेडिकल कचरा त्यांना मोठ्या प्रमाणात सापडला. हा असा कचरा आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्यामुळे मेडिकल कचऱ्याच्या विल्हेवाटीची गंभीर समस्या समोर आली आहे.

आता सुट्टीचा काळ सुरू असल्याने दादर किनारा आणि शिवाजी पार्कवर येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होते. परंतु, या घटनेनंतर इथे येणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 'यापूर्वीही सफाईदरम्यान काही वेळा मेडिकल कचरा सापडला होता. पण, नशा किंवा इतर कारणांनी सामान्यांकडून इंजेक्शनचा वापर केला गेला असल्याचा प्राथमिक अंदाज लावून आम्ही त्यावेळी 'जी-नॉर्थ' विभागाच्या पालिका कार्यालयात तोंडी तक्रार केली होती. परंतु, पालिकेने त्यावेळी याकडे काणाडोळा केला. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे,' असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हा कचरा हाताळण्यासाठी प्रशिक्षण दिलेले असते. हा कचरा पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याची पुरेपूर माहिती असताना, असा सगळा कचरा व्यवस्थित बांधून किनाऱ्यावर टाकल्याने तो हॉस्पिटल किंवा क्लिनिकमधूनच टाकला असल्याच्या संशायालाही दुजोरा मिळत आहे.

इतर प्रश्नांचीही हेळसांड

चौपाटीवर असणाऱ्या घोड्यांमुळेही स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांच्या मलमुत्राची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. शिवाय, घोड्यांकडेही दुर्लक्ष केले जाते. याची लेखी तक्रार शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडेही केली होती. त्यानंतर फक्त एक दिवस हे सगळे थांबून दोन-तीन दिवसांतच सगळा प्रकार पुन्हा सुरू झाला. त्यामुळे इथेही निराशाच पदरी पडल्याचे कार्यकर्ते सांगतात.

आतापर्यंत बीच स्वच्छतेच्या दरम्यान अनेकवेळा आम्हाला असा कचरा सापडला होता. पण कालच्या प्रसंगानंतर पालिकेने आणि एकूणच प्रशासनानेही याकडे गंभीरपणे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. असे भयावह प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर काही ठोस पावले उचलणेही गरजेचे आहे.

- जय शृंगारपुरे, सर्वेसर्वा-जय फाऊंडेशन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज