अ‍ॅपशहर

...तर ग्राहकांना सव्याज परतावा द्या

वीज बिलासंदर्भात अदानी इलेक्ट्रिसिटीने दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत वीज नियामक आयोगाचे पूर्ण समाधान झालेले नाही. ऑक्टोबर महिन्याच्या वीजबिलात वाढ झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे.

Maharashtra Times 8 Dec 2018, 3:23 am
वीज आयोगाचे आदेश,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम MERC


अधिक बिलआकारणी झाल्यास मीटरपडताळणी करणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

वीज बिलासंदर्भात अदानी इलेक्ट्रिसिटीने दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत वीज नियामक आयोगाचे पूर्ण समाधान झालेले नाही. ऑक्टोबर महिन्याच्या वीजबिलात वाढ झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे. इतकेच नव्हे तर ज्या ग्राहकांना सरासरी वीजवापरापेक्षा १५ टक्क्यांहून जास्त वीजबिल आले असल्यास त्या ग्राहकांच्या विजेच्या मीटरची पडताळणी करावी तसेच जास्तीचे वीजबिल आकारल्याचे आढळून आल्यास ती रक्कम ग्राहकांना व्याजासह परत द्यावी असा स्पष्ट आदेश आयोगाने दिला आहे.

वीजबिलाबाबत कंपनीच्या स्पष्टीकरणाची आणखी चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची सत्यशोधन समिती नियुक्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्यात कंपनीकडून ५० ते २०० रुपये वाढीव वीजबिल आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर उपनगरवासीयांनी केल्या होत्या. वाढीव वीजबिलाबाबत राजकीय पक्षांनीही कंपनीवर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसने तर कंपनी लूट करत असल्याचा आरोप केला होता. 'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. वाढत्या जनक्षोभाची दखल ऊर्जामंत्र्यांसह खुद्द मुख्यमंत्रांनीही घेतली होती. वाढीव बिल दिले असेल, तर ग्राहकांना परतावा दिला जाईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. ग्राहकांच्या तक्रारीची दखल आयोगानेही घेतली व २४ तासांत खुलासा करावा, असा आदेश ४ डिसेंबर रोजी कंपनीला दिला. त्यानंतर कंपनीने खुलासा केला.

ऑक्टोबर महिन्यात वाढते तापमान आणि आर्द्रता यामुळे या महिन्यात ग्राहकांकडून विजेचा वापर वाढला, साहजिकच दर त्या प्रमाणात आकारले जातात. वीजपुरवठ्याची मालकी रिलायन्सकडून आमच्याकडे हस्तांतरित होत असताना कर्मचाऱ्यांनी २७ ऑगस्ट ते एक सप्टेंबर या काळात संप केला. त्यामुळे या काळात ग्राहकांच्या मीटरचे वाचन उपलब्ध झाले नाही, परिणामी ३.२५ लाख ग्राहकांची वीजबिले सरासरीवर आधारित काढण्यात आली. मात्र, ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष मीटर रीडिंग करून बिले काढण्यात आली, असा खुलासा अदानी कंपनीने केला होता. त्यावर शुक्रवारी आयोगाने निर्णय दिला.

सकृतदर्शनी ऑक्टोबर महिन्यात वीजबिलांत वाढ झाल्याचे दिसत आहे, असे स्पष्ट करताना कंपनीच्या खुलाशावर आणखी स्पष्टीकरण गरजेचे आहे, असे म्हटले आहे. विजेचा कमी वापर असणाऱ्या निवासी ग्राहकांच्या वीजवापरावर हवामानाचा कोणता परिणाम झाला, विविध वितरण परवानाधारकांनी इंधन समायोजन आकार मागील वीजबिल वसुलीच्या संदर्भात आणि सरासरी वीज वापराच्या तत्त्वावर बिले देण्याबाबत कोणते धोरण स्वीकारले आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

आयोगाचे आदेश

> वीज वापराच्या आकस्मिक वाढीची त्याच बरोबर वाढीव बिलाची करणे शोधणे व भविष्यात आकस्मिकपणे बिलात वाढ होण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्यासाठी दोन सदस्य सत्यशोधन समिती नेमावी

> ज्या ग्राहकांना सरासरी वीज वापरापेक्षा १५ टक्क्यांहून अधिक वीज बिल आले आहे, त्यांच्या मीटरचे रीडिंग तपासावे, जास्तीचे बिल आकारल्यास अतिरिक्त रक्कम ग्राहकांना व्याजासह परत द्यावी

> ग्राहक तक्रार निवारण्यासाठी शिबिरे घ्यावीत, वीज दर व वीज आकार यापेक्षा अधिक रक्कम आकारू नयें

'अदानी'कडून स्वागत

आयोगाच्या या आदेशाचे कंपनीने स्वागत केले आहे. सत्य शोधन समितीपुढे वस्तुस्थिती मांडण्यात येईल, दर आकारणीबाबत आयोगाच्या निकषाचे यापुढेही पालन करू तसेच बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करू, असे कंपनीने म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज