अ‍ॅपशहर

पंतप्रधान मोदींची एक कृती आणि उद्धव ठाकरेंनी थेट मध्यावधी निवडणुकांचा अंदाज बांधला; नेमकं काय घडलं?

Shivsena News : राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळे कामाला लागा, असे आदेश उद्धव यांनी दिल्याचे समजते. खासदार अरविंद सावंत, आमदार मनिषा कायंदे यांनीही उद्धव यांच्या या संकेताला दुजोरा दिला.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2022, 7:32 am
मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे भाकीत वर्तवतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी प्रकल्पांच्या घोषणा केल्या आहेत, याचाच अर्थ राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात', असे त्यांनी सांगितल्याचे समजते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray narendra modi
उद्धव ठाकरे - नरेंद्र मोदी


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळे कामाला लागा, असे आदेश उद्धव यांनी दिल्याचे समजते. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी नवे प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे. निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून, याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात', असे उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना सांगितल्याचे समजते. खासदार अरविंद सावंत, आमदार मनिषा कायंदे यांनीही उद्धव यांच्या या संकेताला दुजोरा दिला.

'अंधेरी पूर्व'च्या पोटनिवडणुकीचा आज निकाल; ठाकरेंची मशाल विजयाचं खातं उघडणार?

'आमदार फुटू नयेत यासाठीच...'

उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, 'आमदार फुटू नयेत म्हणून उद्धव ठाकरे हे मध्यावधीची भाषा बोलत आहेत. 'स्वत:च्या पक्षातून गेलेल्या लोकांचा आरोप काय आहे, त्यावर उद्धव ठाकरे काय बोलले आहेत का', असा सवालही शेलार यांनी केला आहे. शेलार पुढे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांची सत्ता असतानाच त्यांचे स्वत:चे मंत्री, आमदार, सदस्य पक्ष सोडून गेले. सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे होत्या, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तरी हे सर्व लोक गेले. त्यांनी मतदानही तुमच्याविरोधात केले. शिवसेना दुबळी केली जातेय, बाळासाहेबांच्या विचारांपासून भरकटतेय, राष्ट्रवादी आमच्याशी राजकारण करत असल्याचे या सर्व लोकांचे म्हणणे होते. या सर्व प्रश्नांना बगल द्यायची आणि भावनात्मक मुद्द्यांवर उरलेल्या शिवसैनिकांना टिकवण्यासाठी गद्दारीचं गाजर द्यायचे', असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज