अ‍ॅपशहर

देसाईंनी राजीनामा दिला; CMनी नाकारला!

एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या विरोधकांच्या आरोपांनंतर सुभाष देसाई यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला होता. परंतु, तो त्यांनी नाकारला आहे. स्वतः उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली.

Maharashtra Times 12 Aug 2017, 12:42 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम midc land deal cm devendra fadnavis refused to accept subhash desais resignation
देसाईंनी राजीनामा दिला; CMनी नाकारला!


एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या विरोधकांच्या आरोपांनंतर सुभाष देसाई यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला होता. परंतु, तो त्यांनी नाकारला आहे. स्वतः उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून, नैतिकतेच्या मुद्द्यावर मी आज मुख्यमंत्र्यांशी बोललो. पदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली. राजीनामा दिला. पण याची काही आवश्यकता नसल्याचं सांगत त्यांनी तो नाकारला, असं देसाईंनी सांगितलं. मी कुठल्याही चौकशीसाठी तयार असून त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सुभाष देसाईंनी नाशिकच्या एमआयडीसीमधील १२ हजार हेक्टर आरक्षित जमीन विनाअधिसूचित करून खासगी विकासकाला बहाल केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. या घोटाळ्याबद्दल त्यांचा राजीनामा घेऊन ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. अर्थात, देसाईंनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत, राजेंद्र दर्डा आणि नारायण राणे या दोन माजी उद्योगमंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. परंतु, विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता.

या पार्श्वभूमीवर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावरील आरोपांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्यात येईल, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरील आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. त्यानंतर लगेचच सुभाष देसाईंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आणि आज आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला. परंतु, तो त्यांनी नाकारला आहे.

मेहता, देसाईंना वेगळा न्याय का?

भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या आरोपांनंतर, नैतिकतेच्या मुद्द्यावर एकनाथ खडसेंचा राजीनामा घेणारे मुख्यमंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंना वेगळा न्याय का लावत आहेत, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी केला आहे. सुभाष देसाईंनी दिलेला राजीनामा त्यांनी स्वीकारायला हवाच होता, उलट मेहतांचाही राजीनामा घ्यायला हवा होता, असं त्यांनी नमूद केलं. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे प्रकरण तापण्याची चिन्हं आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज