अ‍ॅपशहर

दहावीच्या गुणपत्रिकांत चुका!

दहावीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटून गेले तरी हजारो विद्यार्थी अजूनही गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत असून, छपाईच्या चुका झाल्यामुळे या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अकरावीचा प्रवेश घेताना अडचणी येण्याची भीती व्यक्त होत आहे.

Maharashtra Times 24 Jun 2018, 6:33 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम msbshse


दहावीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटून गेले तरी हजारो विद्यार्थी अजूनही गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत असून, छपाईच्या चुका झाल्यामुळे या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अकरावीचा प्रवेश घेताना अडचणी येण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८ जून रोजी जाहीर करण्यात आला. या विद्यार्थ्यांना आठ दिवसांनी गुणपत्रिकांचे वाटपही करण्यात आले. तरीही शेकडो विद्यार्थी गुणपत्रिकांच्या प्रतीक्षेत आहेत. निकालानंतर हे विद्यार्थी गुणपत्रिका घेण्यासाठी शाळेत गेले असता, शाळेत त्यांच्या गुणपत्रिकाच आल्या नसल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत शाळांनी विभागीय मंडळाकडे चौकशी केली असता, या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये छपाईच्या चुका झाल्या असून, त्या दुरुस्त करून देण्यात येतील, असे सांगण्यात आले. असे सुमारे १३०० विद्यार्थी असल्याचे मंडळातील सूत्रांकडून समजते. यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेशासाठी मूळ गुणपत्रिका सादर करताना अडचण येणार आहे.

यापूर्वी जेव्हा गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले तेव्हा एका शाळेतील गुणपत्रिका दुसऱ्या शाळेत गेल्याचा प्रकार घडला होता. काही दिवसांनी या गुणपत्रिका पुन्हा मंडळाच्या कार्यालयात जमा करून संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आल्या. आता गुणपत्रिकांमध्ये छपाईच्या चुका असल्याचे समोर आले आहे. त्या प्रामुख्याने नावातील चुका, जन्मतारखेतील चुका अशा स्वरूपाच्या आहेत.

...तर प्रवशांसाठी मुदतवाढ द्या!

विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळाल्यास त्यांना अकरावी प्रवेशात अडचण येऊ शकते. याची दखल घेऊन मंडळाने विद्यार्थ्यांना वेळेत गुणपत्रिका द्याव्यात किंवा अकरावी प्रवेशांच्या ऑनलाइन प्रक्रियेची मुदत वाढवावी, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी केली आहे.

गुणपत्रिका लवकरच मिळणार

काही विद्यार्थ्यांना चुका दुरुस्त करून गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत तर काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका लवकरात लवकर दिल्या जातील, असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज