अ‍ॅपशहर

आजोबांचे विचार वाचा म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचं प्रबोधनकारांच्या जयंती दिनी सणसणीत प्रत्युत्तर

Mns News Updates : प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीदिनी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमधून राज्यातील जनतेलाही महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2022, 9:43 am
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरे यांनी आंदोलन करत राज्यातील वातावरण ढवळून काढलं होतं. त्यामुळे राज यांनी त्यांचे आजोबा दिवंगत प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचायला हवेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी लगावला होता. या पार्श्वभूमीवर प्रबोधनकारांच्या जयंतीदिनीच त्यांचे हिंदुत्वाबाबतचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत राज ठाकरे यांनी आपल्या राजकीय विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj thackeray press
राज ठाकरे (फाईल फोटो)


'आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. ते हिंदू संस्कृती, हिंदू धर्म याचे जाज्वल्य अभिमानी होते. त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्यांचं एक दुर्मिळ भाषण, मुद्दामून देत आहे. त्यांचे हे विचार जरूर ऐका,' असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप शेअर केली आहे.

मंत्रिपदापेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष पदालाच प्राधान्य, चंद्रकांतदादांच्या मनात शल्य?

'हे भाषण एका 'कृतिशील' विचारवंताच आहे. माझ्या आजोबांचा धर्म ह्या कल्पनेला विरोध नव्हता, उलट ते कमालीचे हिंदू धर्माभिमानी होते. फक्त धर्माच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी, फसवेगिरी त्यांना रुचायची नाही, आणि असल्या भोंदूगिरी करणाऱ्यांवर ते हल्ला चढवत. थोडक्यात आख्ख आयुष्य त्यांनी लोकांच्या मनातील धर्माची भीती काढून, धर्माबद्दल आस्था, प्रेम निर्माण व्हावं म्हणून वेचलं. या भाषणात त्यांनी नाठाळांवर वेळेस रट्टे ओढताना मागे पाहू नका असं आवाहन केलं आहे आणि हे करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत हे विसरू नका ह्याची आठवण करून दिली आहे,' असं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.



राज यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमधून राज्यातील जनतेलाही आवाहन केलं आहे. 'रझाकारी औलादी डोकं वर काढत आहेत, अनेक ठिकाणी आया-बहिणींची छेड काढत आहेत, या भाषणात आमच्या आजोबांनी जसं म्हणलं आहे तसं त्यांच्या गालावर वळ उठवा आणि हे करताना मी या पक्षाचा, त्या पक्षाचा असला विचार करायची गरज नाही. कदाचित तुमचे नेते कच खातील, पण तुम्ही खाऊ नका. प्रबोधनकारांना अभिवादन करताना एक निर्धार प्रत्येकानेच केला पाहिजे कि, जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे पेटून उठायचं आणि अन्यायाचा फडशा पाडायचा... हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल,' असंही राज ठाकरे म्हणाले.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज