अ‍ॅपशहर

छगन भुजबळांना मंत्री केलं, ते स्वातंत्र्यसैनिक होते का?, राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या २ मंत्र्यांना झोडपलं

तब्बल दोन वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर पाडवा मेळावा घेतला. या मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं तर अजित पवार यांची नक्कल केली.

Edited byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2022, 9:02 pm
मुंबई : तब्बल दोन वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर पाडवा मेळावा घेतला. या मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं तर अजित पवार यांची नक्कल केली. तसंच महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांवर देखील टीकेचे बाण सोडले. छगन भुजबळांना मंत्री केलं, ते स्वातंत्र्यसैनिक होते का?, असा सवाल राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला केला. तर जेलमध्ये असलेल्या मलिकांवरही राज ठाकरेंनी आसूड ओढले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Raj thackeray And Chhagan Bhujbal
राज ठाकरे आणि छगन भुजबळ


राज ठाकरेंच्या निशाण्यावर राष्ट्रवादीते २ मंत्री

राज ठाकरे म्हणाले, "याच शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून पहिल्या मंत्र्याचं नाव जाहीर झालं ते म्हणजे छगन भुजबळ... जे दोन वर्ष जेलमध्ये होते. अहो ते काय स्वातंत्र्यसैनिक नव्हते, सत्ता आल्याआल्या मंत्रिपद द्यायला.... पण ही सगळी लोकं तुम्हाला गृहित धरतात. तुमच्या नाकावर टिच्चून असं वागतात. काय उखाडणार आहात उखाडा... तुमचा फक्त एक दिवस... तुम्ही फक्त मतदान करायचं.."

"महाराष्ट्राचा दुसरा मंत्री नवाब मलिक जेलमध्ये गेला. जेलमध्ये जाताना तुमच्या नाकावर टिच्चून तुम्हाला गाडीतून हात दाखवतो. इतकी हिम्मत येते कुठून? कारण हेच की जनतेला गृहित धरणं...राजकीय पक्ष तुम्हाला मेंढरासारखे वापरतायत", असं राज म्हणाले.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद फोफावला, राज ठाकरेंचा पुनरुच्चार

दुसरीकडे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद फोफावला असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ते म्हणाले, "राष्ट्रवादीचा १९९९ साली जन्म झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यात जातीयवाद फोफावला. त्याअगोदर राज्यात जाती होत्या... जातीबद्दलचा अभिमान होता. पण पवारांच्या मतानुसार त्यांना जातीयवाद हवा होता, नंतर तेच झालं"
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख