मुंबई : मोनो रेल्वेचे दोन्ही टप्पे अव्यवहार्य असल्याचा ठपका लोकलेखा समितीने ठेवला असला तरी येत्या जानेवारीत ‘मोनो’चे दोन्ही टप्पे एकत्रित सुरू होणार आहेत. मोनो गाडीला लागलेल्या आगीनंतर बंद ठेवण्यात आलेली वडाळा ते चेंबूरपर्यंतची वाहतूक तोपर्यंत बंदच ठेवण्यात येणार असून, चेंबूर ते सातरस्ता या दुसरा टप्प्यासोबतच ती पुन्हा रुळांवर येईल. मात्र सलग मार्गावर पूर्ण क्षमतेने मोनो चालवण्यासाठी पुरेशा संख्येने गाड्याच नसल्याने नियोजनासंदर्भात लोकलेखा समितीच्या ठपक्याला बळकटीच मिळाली आहे.
कोट्यवधी रुपयांचा मोनो प्रकल्प राबवताना वेळेची बचत, लोकांची सोय, वाहतुकीची वर्दळ आदी बाबी ध्यानात घेतलेल्या नाहीत, तसेच दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकाही लोकांच्या सोयीची नाही, असा ठपका ठेवत ‘मोनो’चे दोन्ही टप्पे अव्यवहार्य व गैरसोयीचे आहेत, असे ताशेरे लोकलेखा समितीने ओढले आहेत. त्यासंदर्भातील वृत्त शुक्रवारी ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाले. या पार्श्वभूमीवर ‘मोनो’च्या दुसऱ्या टप्प्याचे काय होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र तरीही एमएमआरडीए दोन्ही टप्पे चालवण्यावर ठाम आहे. दोन्ही टप्पे एकत्र सुरू होणार असले तरी वडाळा ते सात रस्ता या सलग मार्गासाठी आणखी दहा गाड्यांची आवश्यकता आहे. सध्या ताफ्यातील सहा गाड्यांवर ‘मोनो’ची भिस्त आहे. त्यामुळे वडाळा ते सात रस्ता असा पल्ला वाढल्यानंतर मोनो पूर्ण क्षमतेने धावू शकत नाही. परिणामी फेऱ्यांची संख्या कमी व दोन गाड्यांमधील वेळ अधिक असेल. सध्या चार मिनिटांच्या अंतराने मोनो धावते. मात्र गाड्यांची संख्या अपुरी असल्याने हा कालावधी आठ ते दहा मिनिटांचा असण्याची शक्यता आहे.
गाड्यांची कमतरता
पहिल्या टप्प्यात तोट्याचे गणित मांडणारी ‘मोनो’ सेवा दुसऱ्या टप्प्यात अधिक प्रवासीसंख्या मिळवण्याची चिन्हे आहेत. मात्र वडाळा ते सातरस्ता हा पल्ला वाढल्यास व प्रवासीसंख्याही वाढल्यास गाड्यांची कमतरता जाणवणार आहे. मोनोच्या पहिल्या टप्प्प्यात रोज फक्त १८ हजार प्रवासी प्रवास करतात. दुसऱ्या टप्प्यात हा आकडा दोन लाखांच्या घरात जाईल, असा ‘एमएमआरडीए’चा दावा आहे. अशा वेळी फक्त सहाच गाड्या असतील तर लोकांची गैरसोय होणार हे स्पष्ट आहे. आणखी दहा नव्या गाड्या घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया डिसेंबर अखेरीस संपणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात नव्या गाड्या ताफ्यात येण्यास किती काळ लागेल याची निश्चिती नाही.
दुसऱ्या टप्प्यासाठी वेगळी कंपनी
मोनोच्या पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन स्कोमी या मलेशियन कंपनीकडे आहे. मात्र हा मार्ग बांधण्यासाठी आलेल्या खर्चावरून स्कोमी आणि एमएमआरडीएमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने वडाळा ते जेकब सर्कल या पूर्ण मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे ‘स्कोमी’ऐवजी दुसऱ्या कंपनीला व्यवस्थापनाचे काम देण्याचा एमएमआरडीएचा इरादा पक्का आहे.
''वडाळा, रिफायनरी, चेंबूरसह आणखी कोणत्या भागाला ‘मोनो’च्या परिघात आणता येईल, यादृष्टीने पहिल्या टप्प्याची आखणी झाली. दुसऱ्या टप्प्यातही वर्दळीचे भाग कोणते, लोकल सेवेला ‘मोनो’ कशी जोडता येईल, हा अभ्यास करूनच हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. जगभरातील कोणतीही सार्वजनिक परिवहन सेवा आर्थिक फायद्यात नसते. त्यासाठी सरकार सहकार्य करत असते.'' - यूपीएस मदान, एमएमआरडीए आयुक्त
कोट्यवधी रुपयांचा मोनो प्रकल्प राबवताना वेळेची बचत, लोकांची सोय, वाहतुकीची वर्दळ आदी बाबी ध्यानात घेतलेल्या नाहीत, तसेच दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकाही लोकांच्या सोयीची नाही, असा ठपका ठेवत ‘मोनो’चे दोन्ही टप्पे अव्यवहार्य व गैरसोयीचे आहेत, असे ताशेरे लोकलेखा समितीने ओढले आहेत. त्यासंदर्भातील वृत्त शुक्रवारी ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाले. या पार्श्वभूमीवर ‘मोनो’च्या दुसऱ्या टप्प्याचे काय होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र तरीही एमएमआरडीए दोन्ही टप्पे चालवण्यावर ठाम आहे. दोन्ही टप्पे एकत्र सुरू होणार असले तरी वडाळा ते सात रस्ता या सलग मार्गासाठी आणखी दहा गाड्यांची आवश्यकता आहे. सध्या ताफ्यातील सहा गाड्यांवर ‘मोनो’ची भिस्त आहे. त्यामुळे वडाळा ते सात रस्ता असा पल्ला वाढल्यानंतर मोनो पूर्ण क्षमतेने धावू शकत नाही. परिणामी फेऱ्यांची संख्या कमी व दोन गाड्यांमधील वेळ अधिक असेल. सध्या चार मिनिटांच्या अंतराने मोनो धावते. मात्र गाड्यांची संख्या अपुरी असल्याने हा कालावधी आठ ते दहा मिनिटांचा असण्याची शक्यता आहे.
गाड्यांची कमतरता
पहिल्या टप्प्यात तोट्याचे गणित मांडणारी ‘मोनो’ सेवा दुसऱ्या टप्प्यात अधिक प्रवासीसंख्या मिळवण्याची चिन्हे आहेत. मात्र वडाळा ते सातरस्ता हा पल्ला वाढल्यास व प्रवासीसंख्याही वाढल्यास गाड्यांची कमतरता जाणवणार आहे. मोनोच्या पहिल्या टप्प्प्यात रोज फक्त १८ हजार प्रवासी प्रवास करतात. दुसऱ्या टप्प्यात हा आकडा दोन लाखांच्या घरात जाईल, असा ‘एमएमआरडीए’चा दावा आहे. अशा वेळी फक्त सहाच गाड्या असतील तर लोकांची गैरसोय होणार हे स्पष्ट आहे. आणखी दहा नव्या गाड्या घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया डिसेंबर अखेरीस संपणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात नव्या गाड्या ताफ्यात येण्यास किती काळ लागेल याची निश्चिती नाही.
दुसऱ्या टप्प्यासाठी वेगळी कंपनी
मोनोच्या पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन स्कोमी या मलेशियन कंपनीकडे आहे. मात्र हा मार्ग बांधण्यासाठी आलेल्या खर्चावरून स्कोमी आणि एमएमआरडीएमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने वडाळा ते जेकब सर्कल या पूर्ण मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे ‘स्कोमी’ऐवजी दुसऱ्या कंपनीला व्यवस्थापनाचे काम देण्याचा एमएमआरडीएचा इरादा पक्का आहे.
''वडाळा, रिफायनरी, चेंबूरसह आणखी कोणत्या भागाला ‘मोनो’च्या परिघात आणता येईल, यादृष्टीने पहिल्या टप्प्याची आखणी झाली. दुसऱ्या टप्प्यातही वर्दळीचे भाग कोणते, लोकल सेवेला ‘मोनो’ कशी जोडता येईल, हा अभ्यास करूनच हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. जगभरातील कोणतीही सार्वजनिक परिवहन सेवा आर्थिक फायद्यात नसते. त्यासाठी सरकार सहकार्य करत असते.'' - यूपीएस मदान, एमएमआरडीए आयुक्त