अ‍ॅपशहर

पाऊस पुन्हा सक्रिय होणार

महाराष्ट्र वगळता संपूर्ण देशात सध्या जोरदार पावसाची नोंद होत आहे. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहे.

Maharashtra Times 9 Aug 2017, 4:32 am
पुढील आठवड्यात बरसण्याची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monsoon rains to return in
पाऊस पुन्हा सक्रिय होणार


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र वगळता संपूर्ण देशात सध्या जोरदार पावसाची नोंद होत आहे. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. परंतु ११ ते १७ ऑगस्ट या काळात महाराष्ट्रात पुन्हा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईत पुढील पाच दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

देशात महाराष्ट्र वगळता उत्तर प्रदेश, हरयाणा, चंडीगड, राजस्थान, प. बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालयमध्ये तीव्र अतितीव्र स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे.

मुंबईत सरासरीपेक्षा कमी

मुंबईतून पाऊस सध्या गायब झाला आहे. सांताक्रूझमध्ये सरासरीपेक्षा ८० मिमी तर कुलाबा येथे सरासरीपेक्षा ३०० मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई व परिसरात तुरळक ते हलक्या स्वरूपाच्याच पावसाची नोंद होत आहे.

कोकणात मध्यम पाऊस

कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर पसरलेल्या पावसाची नोंद होत आहे. या भागात पाऊस मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. तेथे मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या नाहीत.

मध्य महाराष्ट्रात सर्वदूर

मध्य महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सर्वदूर पसरलेला पाऊस आहे. मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी आहेत. मात्र नाशिक, मालेगाव, गगनबावडा, कोल्हापूर, महाबळेश्वरमध्ये कमी-अधिक प्रमाणात मुसळधार पावसाच्या नोंदी होत आहेत.

विदर्भात शक्यता

विदर्भातही मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी होत आहेत. परंतु हे चित्र बदलण्याची चिन्हे आहेत. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे पूर्वानुमान हवामान विभागाने व्यक्त केले आहे.

राज्यात बसरणार

सध्या मध्य प्रदेशात चांगल्या पावसाची नोंद होत आहे. पावसासाठी आवश्यक असलेले वातावरण बंगालच्या खाडीत तयार झाले आहे. अजूनही महाराष्ट्रातील पावसाच्या दृष्टीने बंगालच्या खाडीत अनकुल वातावरण तयार झालेले नाही. चांगल्या पावसासाठी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे गरजेचे असते. सध्या तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे खास करून किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर कमी आहे. मात्र येत्या ११ ते १७ ऑगस्टच्या काळात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊन राज्यात पुन्हा पाऊस दाखल होण्याचे पूर्वानुमान हवामान विभागाने व्यक्त केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज