म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
चुनाभट्टीतील ७० वर्षे जुन्या, धोकादायक टाटानगर इमारतीची अवस्था भीषण झाली असून त्यातील १२२ कुटुंबे जीव धोक्यात घालून राहत आहेत. याबाबतचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केल्यानंतर मंगळवारी सरकारी पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या. ही इमारत नव्याने उभी राहीपर्यंत या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबिरात निवारा देण्याचीही मागणी पुढे आली आहे.
टाटानगरमधील या तीन मजली इमारतीचे सर्वच मजल्यांवरील गॅलरीचे कठडे निखळले आहेत. दररोज जीव मुठीत घेउन जगणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित निवाऱ्याची गरज आहे. या इमारतीसंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या इमारतीचे पुनर्वसन होईपर्यंत या सर्व रहिवाशांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्याची मागणी स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी केली आहे. मंगळवारी या इमारतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी राज्य सरकारसह म्हाडा प्राधिकरणाकडे पत्रातून ही मागणी करतानाच त्याचा पाठपुरावाही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.