मुंबई: न्यायालयाचा मनाई आदेश, सरकारनं स्थापन केलेली समिती आणि एसटी महामंडळानं न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्यानंतरही एसटी कामगार (MSRTC Strike) मागे हटण्यास तयार नाहीत. दिवाळीच्या आधीपासून सुरू झालेला कामगारांचा संप सुरूच असून अधिकाधिक व्यापक होत चालला आहे. त्यामुळं राज्यातील सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संपकरी कामगार व संघटनांना कळकळीचं आवाहन केलं आहे. राज्य सरकार कामगारांना दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे, त्यामुळं कामगारांनीही सहकार्य करावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपल्या आवाहनपर संदेशात उद्धव ठाकरे म्हणतात, 'एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी राज्य सरकार मनापासून प्रयत्न करीत आहे. आपला प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार काय काय पावलं उचलत आहे हे उच्च न्यायालयासमोर देखील सांगितलेलं आहे. न्यायालयाचं देखील समाधान झालं आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणं आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही करोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळं कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी नम्र विनंती आहे.'
विरोधकांना टोला
एसटी कामगारांना विनंती करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपसह विरोधी पक्षांना टोला हाणला आहे. 'राजकीय पक्षांनी गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळ्यांवरआपल्या राजकीय पोळ्या भाजू नयेत. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्यावं,' असं म्हटलं आहे.
विरोधकांना टोला
एसटी कामगारांना विनंती करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपसह विरोधी पक्षांना टोला हाणला आहे. 'राजकीय पक्षांनी गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळ्यांवरआपल्या राजकीय पोळ्या भाजू नयेत. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्यावं,' असं म्हटलं आहे.