अ‍ॅपशहर

​ अबू सालेमचा निकाल १६ जूनला

मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व गँगस्टर अबू सालेम याच्यासह रियाज सिद्दिकी, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्या, अब्दुल कयूम, करीमुल्ला शेख व फिरोज अब्दुल रशीद खान या सात जणांविषयी येत्या १६ जूनला ​‘ टाडा’ न्यायालय निकाल देणार आहे.

Maharashtra Times 30 May 2017, 2:01 am
मुंबई १९९३ बॉम्बस्फोट खटला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai bombblast abu salem result n 16th june
​ अबू सालेमचा निकाल १६ जूनला


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व गँगस्टर अबू सालेम याच्यासह रियाज सिद्दिकी, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्या, अब्दुल कयूम, करीमुल्ला शेख व फिरोज अब्दुल रशीद खान या सात जणांविषयी येत्या १६ जूनला ​‘ टाडा’ न्यायालय निकाल देणार आहे.

मुंबईत १२ मार्च, १९९३ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामध्ये २५७ जण ठार झाले होते व सुमारे एक हजार जखमी झाले होते. त्याप्रकरणी ‘टाडा’ न्यायालयाचे तत्कालिन न्या. प्रमोद कोदे यांनी २००७ मध्ये दिलेल्या निकालात शंभर आरोपींना शिक्षा ठोठावली होती. त्यात याकूब मेमनसह डझनभर आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती. अभिनेता संजय दत्त याला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. याकूब मेमन याला फाशी झाली, तर संजय दत्त याने सर्वोच्च न्यायालयाने सहाऐवजी पाच वर्षे दिलेली शिक्षा भोगली आहे. या खटल्यातील अबू सालेमसह सात आरोपी निकालाच्या टप्प्यात भारतात आल्याने त्यांचा खटला वेगळा करण्यात आला. त्याची सुनावणी ‘ टाडा’ न्यायालयाचे न्या. जी.ए. सानप यांच्यापुढे सुरु होती. ती संपली असून सोमवारी न्यायालयाने १६ जूनला निकाल देण्याचे जाहीर केले.

अबू सालेम याला पोतुर्गालमधून प्रत्यार्पित करण्यात आले होते. त्याच्याविरुध्द बॉम्बस्फोटासाठी शस्त्रास्त्रे, स्फोटके यांची वाहतूक केल्याचा आरोप आहे. मुस्तफा डोसा याने बॉम्बस्फोटाच्या कटात भाग घेऊन सहआरोपींना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला पाठविले होते, तर ताहिर मर्चंट याने पाकिस्तानला जाण्याची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. अब्दुल कयूम याने संजय दत्त याला शस्त्र पुरविले होते, तर रियाझ सिद्दिकी याने मारूती मोटारीने स्फोटकांची वाहतूक केल्याचे तपासात आढळून आले होते.

करीमुल्ला याने रायगड ​जिल्ह्याच्या शेखाडी बंदरात शस्त्रास्त्रांची तस्करी केली होती मुस्तफा डोसा याने या खटल्यातील पुराव्यालाच आव्हान दिले आहे. ‘टाडा’ न्यायालयाने फरारी जाहीर केले नसल्याने केल्याने अगोदरच्या खटल्यातील पुरावा आपल्याविरुध्द वापरता येणार नसल्याचा दावा त्याने केला आहे. याशिवाय आमच्याविरुध्दचा खटला पहिल्या खटल्यासोबत एकत्रितपणे चालविण्यात आला नसल्याने अगोदरचा पुरावा ग्राह्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र सरकारपक्षाने आरोपींचा हा बचाव न्यायालयाने मान्य करू नये, असा युक्तिवाद केला आहे. या खटल्यात सीबीआयतर्फे अॅड. दीपक साळवे हे काम पाहात आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज