म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
आर्द्रता आणि दिवसभर असलेले ढगाळ वातावरण यामुळे मुंबईकरांना मंगळवारीही उन्हाचा तडाखा जाणवला. सरासरी तापमानापेक्षा दैनंदिन कमाल तापमानात फारशी वाढ नसली, तरी आर्द्रतेमुळे वास्तविक तापमानापेक्षा जास्त तापमानाची जाणीव मुंबईकरांना झाली. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी दुपारच्या वेळी नागरिकांनी ऑफिसबाहेर आणि घराबाहेर पडणे टाळले. रस्त्यावर गाड्याही कमी होत्या. सतत धावणाऱ्या मुंबईने उन्हामुळे दुपारी जणू काही काळ ब्रेक घेतला.
मंगळवारी सांताक्रूझ आणि कुलाबा दोन्हीकडे ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मात्र किमान तापमानाचा पारा मंगळवारी कुलाबा येथे २७ अंशांपर्यंत पोहोचला होता, तर सांताक्रूझ येथेही किमान तापमान २६.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. उत्तर कर्नाटकजवळ चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. तसेच उत्तर कर्नाटक ते दक्षिण कर्नाटक आणि तमिळनाडूपर्यंत ढगांची द्रोणीय स्थितीही आहे. या घटकांमुळे मुंबईमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वाढलेले तापमान आणि ढगाळ वातावरण यामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थतेची जाणीव होती. रस्त्यावर असलेले प्रवासी कधी एकदा एसी किंवा पंख्याचा वारा अनुभवतो याची वाट पाहत होते, तर लोकलमधून प्रवास करणाऱ्या अनेकांनी मंगळवारी दारावर उभे राहून प्रवासाचा आनंद घेतला. दुपारच्या वेळी लोकलमधील पंख्यांमुळे गरम हवेची निर्मिती होत होती. आज, बुधवारीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. आज, बुधवारी मुंबईमध्ये अंशतः ढगाळ वातावरण असेल, तर कमाल तापमान ३५ आणि किमान तापमान २६ अंश असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुपारी बाहेर पडताना उन्हापासून रक्षण करण्याची जय्यत तयारी करूनच मुंबईकरांनी बाहेर पडणे अपेक्षित आहे.
राज्यात चटके
बुधवारी मुंबईकरांसोबतच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांना बसला. आर्द्रतेने मुंबईकरांमध्ये अस्वस्थता अधिक असते, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये उन्हाचे चटके जास्त जाणवतात. मध्य महाराष्ट्रात बुधवारी सोलापूरचा पारा सरासरीपेक्षा ५ अंशाने वाढून ४५ अंशांपर्यंत पोहोचला होता. सरासरीपेक्षा सर्वाधिक वाढ बुधवारी मध्य महाराष्ट्रात नोंदली गेली, तर मराठवाड्यात परभणीचे तापमानही ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६.६ अंश नोंदले गेले. त्याखालोखाल ब्रह्मपुरी येथे ४६.५ आणि वर्धा येथे ४६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. वर्धा येथे कमाल तापमानासोबतच किमान तापमानातही ५.५ अंशांची वाढ नोंदली गेली.
राज्यातील तापमान
शहर कमाल तापमान (सरासरीपेक्षा वाढ)
पुणे ४१.१ (४.९)
लोहगाव ४१.८ (५.८)
सातारा ४१.९ (६.७)
सोलापूर ४५.० (५.१)
परभणी ४५.६ (३.८)
बुलडाणा ४३.० (५.१)