- सहा ते आठ हजार रुपये जादा द्यावे लागणार
- २६ हजार फुटांपर्यंतच्या उंचीवरून विमाने नेण्यास पाकची मनाई
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
पाकिस्तानने कराची क्षेत्रातील हवाईमार्ग बंद केल्याचा मुंबईहून युरोपात जाणाऱ्या विमानांना भुर्दंड पडण्याची शक्यता आहे. मध्यम आकाराच्या विमानांचा प्रति फेरी ९.७५ लाख तर मोठ्या आकाराच्या विमानांचा प्रति फेरी ३० लाख रुपयांचा खर्च वाढेल. त्यातून तिकीट सहा ते आठ हजार रुपयांनी महाग होऊ शकेल.
मुंबईहून युरोपात जाणाऱ्या विमानांचा कराची हवाई नियंत्रण कक्षाशी आवर्जून संबंध येतो. जे तीन मार्ग पाकिस्तानने उड्डाणासाठी बंद केले आहेत, त्यापैकी एक मार्ग कराची नाविक तळाच्या अखत्यारितील समुद्रावरून जातो. अन्य दोन मार्ग मुंबईतून गुजरातमार्गे, पाकिस्तानातून इराक व तुर्कीमार्गे पुढे युरोपात जातात. पण आता हे मार्ग बंद केल्याने विमानांना अधिक लांबून जावे लागणार आहे.
या क्षेत्रातील संबंधितांनी सांगितले की, 'हे मार्ग बंद झाल्याने आता विमानांना अरबी समुद्रातून ओमान, सौदी अरेबिया या आखाती देशांमधून इजिप्तमार्गे युरोपात दाखल व्हावे लागेल. यामुळे अंतर सुमारे दीडपट वाढेल. पूर्व युरोपात जाण्यासाठी फार फरक पडणार नाही. पण लंडन व फ्रँकफर्टसाठीचे अंतर खूप वाढेल.'
मुंबईहून हिथ्रो (लंडन), फ्रँकफर्ट, पॅरिस, रोम, झुरिच या शहरांसाठी विमानसेवा आहे. पाकिस्तानने मार्ग बंद केल्याने या प्रवासाचे अंतर साधारण ३ हजार ५०० किमीने वाढले आहे. त्यामुळे बोइंग ७३७ या मध्यम आकाराच्या विमानाचा इंधनखर्च साधारण नऊ लाख ७५ हजार रुपये तर बोइंग ७४७ या मोठ्या आकाराच्या विमानाचा इंधनखर्च जवळपास ३० लाख रुपयांनी महागण्याची चिन्हे आहेत. बोइंग ७३७ मध्ये साधारण १६० ते १८० प्रवासी असतात. त्यानुसार प्रति प्रवासी ६४०० रुपये तिकीटदर वाढू शकतो. बोइंग ७४७ ची क्षमता ४०० प्रवाशांची असते. त्यामधील प्रवाशांचे तिकीट जवळपास सात हजार ८०० हजार रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.
..
सध्या सारे काही सामान्य
'हवाई मार्ग बंदीचा तिकीटदरांवर सध्या थेट परिणाम होणार नाही', असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. 'जे मार्ग बंद झाले आहेत त्यामध्ये २६ हजार फुटांची अट घालण्यात आली आहे. संबंधित मार्गांवर त्या उंचीपर्यंत उड्डाण करता येणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यापेक्षा वर उंचीवरून त्या मार्गांचा उपयोग करून युरोपात जाता येईल का? याचा अभ्यास सुरू आहे. सध्या सारे काही सामान्य आहे', असे कंपनीने प्रवक्ते धनंजय कुमार यांनी 'मटा' ला सांगितले.