म. टा. प्रतिनिधी, मुंबई
करोनाकाळात मुंबई शहराला विविध कारणांमुळे रक्ताचा तुटवडा भासत असून, याचा सर्वाधिक फटका थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना बसला आहे. मुंबईतील या कठीण परिस्थितीची माहिती मिळताच कोल्हापूरकर लष्करी जवान रोहित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरहून जवळपास १०५ रक्ताच्या बाटल्या मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. कमी कालावधीत अधिकाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करत मुंबईतील थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी हे रक्तसंकलन करण्यात आले.
थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना दर १५ ते २१ दिवसांतून एकदा रक्त द्यावे लागते. अशावेळी मुंबईतील रक्ताचा तुटवडा अनेकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामध्ये बोरिवली थॅलेसेमिया डे केअर सेंटर येथील काही बालकांना रक्ताची अत्यंत गरज असल्याची माहिती कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेल्या रोहित कदम यांना कळली. रोहित कदम भारतीय लष्करात लान्सनाईक पदावर कार्यरत असून, सध्या लॉकडाउनमुळे कोल्हापूर येथे आपल्या मूळगावी अडकले आहेत. त्यांनी तत्काळ स्थानिक स्तरावर जीवनधारा रक्तपेढी, शाहू रक्तपेढी, कराडची महालक्ष्मी रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून १०५ बाटल्यांचे संकलन केले आणि ते तातडीने मुंबईला धाडले.