म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील कोळीवाडे व गावठाणातील घरांची उंची ३३ फुटांपर्यंत वाढवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाबाबत मुंबई महापालिकेच्या विकास नियमन नियमावलीमध्ये लवकरच तरतूद केली जाणार आहे. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी तसे आश्वासन अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीला दिले आहेत.
कोळीवाडे व गावठाणांची दुरुस्ती व बांधकामाविषयी कोणतेही नियम न बनवल्यामुळे मुंबईतील ४७ कोळीवाडे व ८० गावठाणांची दुरवस्था झाली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने एम. सी. ए. झेड कायद्याअंतर्गत कोळीवाड्यातील घरांची उंची नऊ मीटरपर्यंत वाढवण्यास २०११साली परवानगी दिली होती. केंद्र सरकारच्या पर्यावरण व वनविभागानेही या बदलास मंजुरी दिली होती. मात्र मुंबई महापालिकेने त्यांच्या विकास नियमन नियमावलीमध्ये तशी तरतूद केली नव्हती. परिणामी कोळीवाड्यांचा कायापालट होत नव्हता.
या संदर्भात समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल तसेच आनंद हुले यांनी आयुक्तांची भेट घेतली. घराची उंची ३३ फुटापर्यंत करण्याबाबत अधिसूचना काढावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या महिन्याभरात विकास नियमन नियमावलीमध्ये पुनर्विकासासंबंधी तरतुदीचा समावेश करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती तांडेल यांनी दिली.
कोकणालाही फायदा
सरकारच्या अधिसूचनेचा फायदा मुंबईसह कोकणातील मच्छिमारांनाही मिळणार आहे. या भागातील लोक घरांची उंची ३३ फुटापर्र्यत वाढवू शकतील. घर प्रशस्त झाल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास- न्याहारी योजनेचा लाभ या भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर मिळून त्यायोगे पर्यटन वाढेल, असा विश्वास तांडेल यांनी व्यक्त केला.