अ‍ॅपशहर

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; रात्री उशीरापर्यंत धावणार मेट्रो, शेवटची गाडी कधी सुटणार?

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता उशीराही मेट्रोने प्रवास करता येणार आहे. या मेट्रो मार्गिकेवरील गाड्यांची वेळ वाढविण्यात आली आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 6 Aug 2022, 7:02 am
घाटकोपरहून ११.४४ वाजता शेवटची गाडी सुटणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai-metro


म. टा. प्रतिनिधीमुंबई : घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता उशीराही मेट्रोने प्रवास करता येणार आहे. या मेट्रो मार्गिकेवरील गाड्यांची वेळ वाढविण्यात आली आहे. त्यातून आता घाटकोपरहून शेवटची गाडी रात्री ११.४४ वाजता सुटणार आहे. ही गाडी वर्सोवा येथे रात्री १२.०७ वाजता पोहोचेल. तर वर्सोवाहून घाटकोपरसाठी रात्री ११.१९ वाजता शेवटची गाडी सुटेल, अशी माहिती 'मुंबई मेट्रो वन' प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मेट्रो १ने गाड्यांची वेळ वाढविण्याबरोबरच या मेट्रो मार्गिकेवरील गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही वाढ केली आहे. कार्यालयीन दिवसांमध्ये पूर्वी ३२६ फेऱ्या होत. आता या फेऱ्यांची संख्या ३५६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय एमएमओपीएलने घेतला आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार असून त्यांचा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे. तसेच गर्दीच्या वेळेत प्रत्येक ४ मिनिटांनी मेट्रो गाडी धावणार आहे.

मेट्रो १च्या प्रवाशांमध्ये वाढ होत आहे. जुलैमध्ये मेट्रोने ८० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. सद्यस्थितीत कार्यालयीन दिवसात ३ लाख २५ हजार प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहे. करोना साथीच्या फैलावानंतर प्रथमच वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवरील प्रवासीसंख्या सव्वा तीन लाखांवर पोहचली आहे. करोनाची साथ पसरल्यानंतर मार्च २०२०मध्ये लॉकडाउन लावल्यावर मेट्रो १वरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. मेट्रो प्रवास पुन्हा सुरू झाल्यानंतर सुरवातीला केवळ १३ हजार प्रवाशीच होते. त्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रवासी संख्या वाढून १ लाखापर्यंत पोहचली. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा कडक निर्बंध लागू केल्यामुळे प्रवासी संख्या ५० हजारांच्या खाली गेली. दरम्यान दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर मेट्रो १मधील प्रवासी संख्या हळूहळू वाढू लागली आहे.

प्रवासी घटले

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागल्यावर मेट्रोची प्रवासी संख्या पहिल्यांदा २ लाखांपुढे गेली. आता पुन्हा करोनानंतरची स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर प्रवासीसंख्येत वाढ झाली असली तरी ती करोनापूर्व पातळीपेक्षा कमीच आहे. करोनापूर्वी ४ लाख ते ४ लाख ५० हजार नागरिक दरदिवशी मेट्रोतून प्रवास करत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज