अ‍ॅपशहर

...अन्यथा पक्ष कार्यालये पाडू!

कुलाबा वांद्रे सीप्झ या मेट्रो मार्गासाठी नरिमन पॉइंट येथील पक्ष कार्यालयांचा ताबा देण्याबाबत अनेकदा सूचना आणि विनंती करूनही दाद न दिल्याने २६ डिसेंबरपर्यंत पर्यायी जागेत स्थलांतर न केल्यास काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची कार्यालये पाडण्यात येतील, असा सज्जड इशारा मेट्रोने दिला आहे.

Maharashtra Times 16 Dec 2016, 4:01 am
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai metro warns of demolishing political party offices in nariman point
...अन्यथा पक्ष कार्यालये पाडू!


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

कुलाबा वांद्रे सीप्झ या मेट्रो मार्गासाठी नरिमन पॉइंट येथील पक्ष कार्यालयांचा ताबा देण्याबाबत अनेकदा सूचना आणि विनंती करूनही दाद न दिल्याने २६ डिसेंबरपर्यंत पर्यायी जागेत स्थलांतर न केल्यास काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची कार्यालये पाडण्यात येतील, असा सज्जड इशारा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिला आहे.

मेट्रो मार्गासाठी या तीन पक्षांसह भारिप, बहुजन महासंघ, शेकाप, समाजवादी पक्ष यांसह २५ सरकारी कार्यालयांची जागा तात्पुरती किंवा कायमस्वरूपी लागणार आहे. त्यासाठी या कार्यालयांना बेलार्ड इस्टेट येथे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या भूखंडावरील इमारतीत पर्यायी जागाही देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत पक्षांनी पर्यायी जागेत स्थलांतर करणे आवश्यक होते. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी अद्याप कार्यालयांचा ताबा सोडलेला नाही. या पक्षांच्या कार्यालयाची जागा काही वर्षांसाठी तात्पुरत्या स्वरूपात लागणार आहे. भूमिगत स्थानकाच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा मूळ जागीच नव्याने कार्यालये बांधून दिली जाणार आहेत. परंतु या पक्षांच्या असहकारामुळे मेट्रोच्या कामात अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांना नोटीस पाठवण्यात आली आहे. बेलार्ड इस्टेट येथे पर्यायी जागा देण्यात आली आहे. या कार्यालयाच्या अंतर्गत रचनेचा नकाशाही मान्यतेकरिता पाठवला आहे. परंतु त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. मेट्रो प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण पर्यायी जागेत स्थलांतर करावे, ​​किंवा अन्य पर्यायी व्यवस्था करावी व सध्याची जागा कॉर्पोरेशनच्या ताब्यात द्यावी, अन्यथा तुमचे कार्यालय पाडावे लागेल, असे कॉर्पोरेशनने पाठवलेल्या नोटिसीत म्हटल्याचे समजते.

तरीही असहकार

मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘वॉर रूम’च्या बैठकित राजकीय पक्षांच्या कार्यालयांच्या स्थलांतरणाचा मुद्या उपस्थित झाला होता. यावेळी राजकीय पक्ष लवकरच पर्यायी जागेत स्थलांतर करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु पुढे काहीच घडले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज