म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
चेन्नईमध्ये वारंवार येणाऱ्या पुरानंतर नागरिकांना इशारा देण्यासाठी तेथे पुराचा इशारा देणारी यंत्रणा निर्माण करण्यात आली. मुंबईनेही यंदाच्या पावसाळ्यात अशाच स्थितीचा सामना केला. या पार्श्वभूमीवर या शहरातही पुराचा इशारा देणारी यंत्रणा मुंबई महापालिका, राष्ट्रीय तटीय संशोधन केंद्र यांच्या मदतीने पृथ्वीविज्ञान मंत्रालय कार्यान्वित करणार आहे. येत्या पावसाळ्यात एका अॅपच्या माध्यमातून ही माहिती मुंबईकरांना उपलब्ध होईल.
पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन यांनी या यंत्रणेसंदर्भात माहिती दिली. मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाच्या कार्यालयाला भेट दिल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या संदर्भात सांगितले. 'या यंत्रणेमुळे पुरासंदर्भातील इशारा २४ तास आधी मुंबईकरांना मिळेल अशी शक्यता आहे. आधी झालेला पाऊस, किती पाणी ओसरले, भरतीच्या लाटांची उंची, अपेक्षित पाऊस या माहितीवर आधारित हा इशारा जारी करण्यात येणार आहे. सुरुवातीला २४ तास आधी पुराचा इशारा देण्यात येईल, त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून सुमारे तीन दिवस आधी यासंदर्भातील इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे', असे राजीवन यांनी स्पष्ट केले. यासाठी मिठीच्या पात्राचेही आरेखन करण्यात आले आहे. या संदर्भातील कामाचा आढावा त्यांनी शनिवारी घेतला. त्याचसोबत रडारसंदर्भातील माहितीही त्यांनी घेतली.
'ही यंत्रणा जिओइन्फर्मेशनवर आधारित आहे. यापुढे नेमकी काय हानी होऊ शकते, त्याविषयी पूर्वानुमान देण्याचा प्रयत्न हवामान विभाग करणार आहे, अशी माहिती या विभागातर्फे देण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी, मान्सूनचे बदलते स्वरूप, थंडीचे उशिराने झालेले आगमन, उष्णतेच्या लाटा या सर्वांचा अभ्यास करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. यंदाच्या पावसाळ्यात कमी कालावधीत अधिक पाऊस असे स्वरूप पाहायला मिळाले. याबद्दलही अभ्यास करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच, प्रत्येक घटनेचा जागतिक तापमानवाढीशी संबंध जोडता येत नाही. तरीही समुद्राची पातळी वाढत आहे, हे वास्तव आहे. मात्र, यामागची व्यावसायिक कारणेदेखील लक्षात घेण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.
आपत्कालीन घटनांना तोंड देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरूच असतात. मात्र, बदलते ऋतूचक्र आणि जागतिक तापमानवाढ या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येत काम केले पाहिजे. लोकसहभाग महत्त्वाचा आहे.
- डॉ. माधवन राजीवन, सचिव, पृथ्वीविज्ञान मंत्रालय