म. टा. प्रतिनिधी, मुंबई
कोकणातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प जनतेवर लादणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी विधान परिषदेत पुन्हा एकदा स्पष्ट केले. 'स्थानिक जनतेची सहमती असले तरच हा प्रकल्प होईल. जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत', असे देसाई यांनी स्पष्ट केले.
नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात काँग्रेसच्या सदस्य हुस्नबानू खलिफे यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलताना, 'नाणार प्रकल्पासंदर्भात सौदी अरेबिया येथील अरामको या कंपनीशी राज्य शासन स्तरावर सामंजस्य करार झालेला नाही', असे देसाई यांनी स्पष्ट केले. 'कायद्यातील तरतुदीनुसार भूधारकांच्या संमतीनेच भूसंपादन करण्याचे धोरण शासनाने मान्य केले असल्याने रिफायनरी प्रकल्पाचे भूसंपादन भूधारकांच्या संमतीखेरीज करण्यात येणार नाही. सद्यस्थितीत तेथे कुठलेही काम सुरू नाही', असेही देसाई यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांनी भाग घेतला.