अ‍ॅपशहर

'मोदींनी कसे सहकारी निवडलेत हे राज्याला आणि देशालाही कळलं'

नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणे व भाजपवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

Edited byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Aug 2021, 2:26 pm
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं राज्यातील वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. भाजप व शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी केंद्रीय मंत्रिपदावरील व्यक्तीच्या अशा प्रकारच्या भाषेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही, तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय,' अशी बोचरी टीका पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Narayan Rane-Narendra Modi
नारायण राणे-नरेंद्र मोदी


ते पत्रकारांशी बोलत होते. 'नारायण राणे यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून राज्याला व देशाला कळली,' असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. 'हे वक्तव्य राणे यांचं नसून नरेंद्र मोदी यांचं आहे असं समजावं लागेल कारण त्यांनीच राणे यांना मंत्री केलं आहे,' असंही जयंत पाटील म्हणाले.

'अशा पद्धतीनं बोलणार्‍या लोकांना प्रत्येक राजकीय पक्षांनी किती महत्त्व द्यावं यावर विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला भले राग असेल किंवा भाजपला उद्धव ठाकरेंविषयी द्वेष वाटत असेल, राग असेल तरी ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही,' असं त्यांनी म्हटलं आहे.

'जनतेने निवडलेल्या मुख्यमंत्र्यांचा हा अपमान असून ज्यावेळी मुद्दे संपतात त्यावेळी माणसं गुद्दयावर येतात. भाजपचे मुद्दे संपलेले आहेत हे यावरून स्पष्ट दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकर खुलासा करावा नाहीतर राज्यात व देशात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजपचे लोक लागले आहेत असं चित्र निर्माण होईल, असंही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना जास्त मनावर घेऊ नका!

चंद्रकांत पाटील यांनी राणेंची पाठराखण करत त्यांच्या स्वभावाचं गुणवर्णन केलं आहे. त्याबद्दल विचारलं असता जयंत पाटील प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांना जास्त मनावर घेत जाऊ नका. दोन वर्षे ते राजकीय बदल होणार हेच सांगत आहेत. त्यामुळं टीआरपी टिकवायचा असेल तर चंद्रकांत पाटील यांना किती महत्त्व द्यायचं हे ठरवा.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज