- माहिती तातडीने कळवणे महत्त्वाचे
- गर्दीचा फायदा घेऊन मुले सोडली जातात
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
विविध कारणांनी सोडून दिलेल्या अल्पवयीन मुलांची नोंद होणे, त्यांचे रिपोर्टिंग केले जाणे महत्त्वाचे आहे, असे मत एका चर्चासत्रात नुकतेच व्यक्त झाले. या चर्चासत्राचे आयोजन बालआशा ट्रस्ट या अशा मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेने केले होते. सार्वजनिक रुग्णालयासह उपनगरीय रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते, बालरोगतज्ज्ञ, बालकल्याण समितीचे सदस्य या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
सार्वजनिक रुग्णालयातील गर्दीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या कारणांसाठी येथे लहान मुलांना आणून सोडण्याचे प्रमाण वाढते आहे. तान्हा बाळापासून शाळकरी मुलांपर्यंत काही मुलांना 'ओपीडी'च्या बाहेर सोडण्यात येते. अशावेळी या मुलांचे काय करायचे, असा प्रश्न तेथे असलेल्या डॉक्टरांपुढेही असतो. या मुलांना सुरक्षित जागी, जबाबदार यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमके काय करायला हवे, याचे मार्गदर्शन या चर्चासत्रात करण्यात आले.
अल्पवयीन मुले ही अनेकदा रेल्वे स्थानके, रुग्णालये आणि कचराकुंड्या यांच्या शेजारी सोडून दिली जातात. या मुलांचे रिपोर्टिंग करणे अतिशय गरजेचे असते. ही मुले ज्या कुणाच्या निर्दशनास येतील, त्यांनी यासंदर्भातील माहिती पोलिसांना तातडीने कळवायला हवी. चौकशी होईल या धास्तीने वा अन्य गैरसमजांमुळे या मुलांची माहिती कळवली जात नाही. त्यामुळे अशी शेकडो मुलांची नोंद होत नाही. त्यांच्यावर भटके कुत्रे वा अन्य प्राणी हल्ला करतात. या मुलांची विक्रीही होते, याकडे बालआशा ट्रस्टचे सुनील अरोरा यांनी या चर्चासत्रात लक्ष वेधले.
२०१५च्या ज्युव्हेनाइल जस्टिस (जेजे) अॅक्ट आणि पोक्सो कायद्यानुसार रुग्णालयांतील सामाजिक कार्यकर्त्यांनीही या मुलांबद्दलची माहिती तातडीने कळवायला हवी. प्रत्येक रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या मुलांच्या संदर्भात निर्णय घेणारी एक समिती असणे अपेक्षित आहे. ज्या रुग्णालयांमध्ये अशा समित्या आहेत, त्यांच्या माध्यमातून या मुलांबद्दलची माहिती पोलिस तसेच बालकल्याण समित्यांना कळवायला हवी. त्यामुळे या मुलांचे पुनर्वसन करण्यास व या मुलांच्या पालकांची माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेस वेग येतो. या कार्यशाळेमध्ये सार्वजनिक रुग्णालयातील अशा प्रकारची प्रकरणे हाताळणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच बालरोगतज्ज्ञही सहभागी झाले होते. अशा प्रकारे हरवणाऱ्या मुलांच्या भवितव्यासाठी प्रत्येकाने जागरुकपणे समाजामध्ये वावरणे गरजेचे आहे, याकडे बालकल्याण समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधले.
०० वैद्यकीय तपासण्या महत्त्वाच्या
हरवलेल्या मुलांच्या वैद्यकीय तपासण्या वेळेवर होणे महत्त्वाचे आहे. केवळ शारिरिक तपासण्या केल्यामुळे मुलांवर हिंसा वा लैंगिक अत्याचार झाले आहेत का याची पुरेशी कल्पना येत नाही, याकडे यावेळी बालरोगतज्ज्ञांनी लक्ष वेधले. रुग्णालयात आलेल्या लहान मुलांना बोलता येत असेल, तर त्यांच्या भाषेत संवाद साधू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने त्यांच्या मनातील दुःख, भीती कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्या मुलांना विश्वास वाटेल, धीर वाटेल अशा प्रकारे पोलिसांचेही वर्तन असायला हवे. तान्ह्या मुलांचा सांभाळ अशावेळी नेमका कशा रितीने करावा, याचे प्रशिक्षण रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना असायला हवे. लैंगिक हिंसा वा अत्याचार झाले असतील, तर त्या दृष्टीने पोलिसांना वैद्यकीय अहवाल उपलब्ध करून देण्यास तप्तरता असायला हवी.