- उद्धव ठाकरेंकडून मोदींची मुक्तकंठाने स्तुती
- मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन कमी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'पुढील महिन्यात आपण राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असून, महाराष्ट्रात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे. युती आहेच. आम्हाला सत्ता हवी आहे. पण सत्तेची हाव नसून राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मेट्रोच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शिवसेनेची भूमिका मांडली.
कलम ३७० रद्द करण्यापासून अनेक निर्णयांबद्दल ठाकरे यांनी मोदी यांची मुक्तकंठाने स्तुती केली. भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाच्या तोडग्यावर काय होणार याबाबतच्या चर्चांना उद्धव ठाकरे यांच्या वरील भूमिकेमुळे पूर्णविराम मिळाला आहे.
युतीचेच राज्य पुन्हा येणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हणताच, तेथे व्यासपीठावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. तोच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले की, बघा सगळ्यात जास्त टाळ्या देवेंद्रजींनीच वाजवल्या आहेत. मी त्यांच्याकडून वाजवून घेतल्या आहेत. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. प्रत्यक्ष चंद्रालाही देशाने गवसणी घातली. याप्रमाणेच नजिकच्या काळात आपण अयोध्येत राममंदिराची उभारणी करून दाखवाल. तसेच समान नागरी कायदाही करून दाखवल्याशिवाय आपण राहणार नाही. देशाच्या अस्मितेचे विषय सक्षमतेने हाताळता आहात. देशाला समर्थ नेतृत्व मोदीजींच्या रूपाने सापडले आहे, असे उद्ध्व ठाकरे म्हणाले.
..
इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल - मुख्यमंत्री
मेट्रो १०, मेट्रो ११ आणि मेट्रो १२ यामुळे मुंबई शहर व उपनगरातील कनेक्टीव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. देशातील मेट्रोचे सर्वात मोठे जाळे महाराष्ट्रात होत असून इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आज भूमीपूजन केलेल्या मेट्रो मार्गांमुळे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसपासून थेट ठाणे, मीरा-भाईंदर, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईपर्यंत जाता येणार आहे. या तीन लाइनमध्ये पुढील दहा वर्षांत ४० लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक यंत्रणा एकात्मिक स्वरूपात करण्याचा प्रयत्न असून, ३२० किमीच्या या मेट्रो मार्गामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही मिनिटेच लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. २०२२ पर्यंत २१२ किमी आणि २०२४ पर्यंत आणखी ८५ किमी मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो ही ग्रीन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. यामुळे जवळपास अडीच कोटी टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे असे ते म्हणाले.
मेट्रो भवनमध्ये सर्व मेट्रो सेवांचे संचलन होणार असून आर्टिफिशियल इंटिलिजन्सद्वारे मेट्रो चालवण्यात येतील. देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात मेट्रो कोच निर्मितीचे कंत्राट 'मेक इन इंडिया'अंतर्गत बीईएमएल या भारतीय कंपनीला देण्यात आले आहे. नागपूर, मुंबई, पुणे येथे मोठ्या प्रमाणात मेट्रोचे काम सुरू असून हायब्रीड मेट्रोच्या माध्यमातून छोट्या रस्त्यांवरही मेट्रो वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. नाशिक येथे हायब्रीड मेट्रो सुरू करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.