म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
पूरस्थिती रोखण्यासाठी एकप्रकारे संरक्षक कवचाचे काम करणारी मिठागरे आणि तिवरांच्या जंगलांवर पुन्हा एकदा घाला घालण्याचे संकेत मिळाले आहेत. ज्या मिठागरांची जागा १००० एकरपेक्षा जास्त आहे, तीच जागा 'पाणथळ जागा' समजावी, अशी नवी व्याख्या केंद्र सरकारने केल्यामुळे मुंबई आणि परिसरातील मिठागरांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. मुंबईतील मिठागरांचे एकूण क्षेत्रफळ ५४०० एकर असले तरी कोणतेही मिठागर सलग एक हजार एकर क्षेत्रफळावर वसलेले नाही. त्यामुळेच धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
मिठागरांच्या जमिनीवर वाजवी दरातील घरबांधणी करण्याचा मनोदय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. मात्र मिठागरांच्या जमिनींवर घरबांधणी झाल्यास पूर्व उपनगरांतील मोठ्या प्रमाणावरील मोकळ्या जागांना नख लागण्याची दाट शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास ही मिठागरे आणि त्यांच्या सभोवतालची तिवरांची जंगले पाण्याला थोपवण्याचे काम करतात. एक प्रकारे संरक्षक भिंत म्हणून त्यांचे योगदान आहे. भविष्यात मिठागरे नष्ट झाल्यास ही नैसर्गिक संरक्षक भिंत नाहीशी होणार आहे.
मिठागरांच्या जमिनी पाणथळ जागा असल्याने त्यावर बांधकामे करता येणार नाहीत, असा अहवाल एमएमआरडीएने २०१६ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणाअंती दिला होता. मिठागरांच्या एकूण जागेपैकी फक्त २५ एकर जागेवरच बांधकाम होऊ शकते, असेही या अहवालात म्हटले होते. म्हणजेच मिठागरांच्या जागेवर बांधकामे करता येणे शक्य नाही, असेच या अहवालातून सुचवण्यात आले होते. मात्र केंद्रीय पर्यावरण खात्याने नव्याने सर्वेक्षण करण्याचा आदेश दिल्याने शंका निर्माण झाली आहे. जी मिठागरे एक हजार एकर जमिनीवर असतील, त्याच जागा पाणथळ जागा समजाव्यात, अशी नवी व्याख्या या खात्याने केल्याचे समजते. मुंबईत ५४०० एकर क्षेत्रावर मिठागरे आहेत. मात्र कोणतेही मिठागर एक हजार एकराच्या सलग क्षेत्रफळावर नाही. प्रत्येक मिठागर ४०० ते ५०० एकराच्या तुकड्यांवर आहे. साहजिकच केंद्राच्या नव्या व्याख्येत ही मिठागरे पाणथळ जागा म्हणून येत नाहीत.
>>'सीआरझेड'चे कवच
'पाणथळ जागा' या व्याख्येमुळे मिठागरांना सीआरझेड कायद्याचे कवच लाभले होते. परिणामी या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची बांधकामे करता येत नाहीत. नव्या व्याख्येने मात्र मिठागरांचे अस्तित्व धोक्यात येऊन बांधकामांना मोकळे रान मिळण्याची भीती आहे. अर्थात या जमिनींवर सध्या तरी घरबांधणीचा कोणताही मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला नाही. घरबांधणी करण्यासाठी केंद्र सरकारला नियमात बदल करावे लागतील. त्यादृष्टीनेच नव्याने हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
>>मुंबईतील मिठागरे
पूर्व उपनगर
घाटकोपर, चेंबूर, ट्रॉम्बे, मंडाळे, तुर्भे, आणिक-वडाळा, कांजुरमार्ग, भांडुप, नाहुर आणि मुलुंड
पश्चिम उपनगर
मालवणी, दहिसर, मिरा-भाईंदर आणि विरार
पूरस्थिती रोखण्यासाठी एकप्रकारे संरक्षक कवचाचे काम करणारी मिठागरे आणि तिवरांच्या जंगलांवर पुन्हा एकदा घाला घालण्याचे संकेत मिळाले आहेत. ज्या मिठागरांची जागा १००० एकरपेक्षा जास्त आहे, तीच जागा 'पाणथळ जागा' समजावी, अशी नवी व्याख्या केंद्र सरकारने केल्यामुळे मुंबई आणि परिसरातील मिठागरांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. मुंबईतील मिठागरांचे एकूण क्षेत्रफळ ५४०० एकर असले तरी कोणतेही मिठागर सलग एक हजार एकर क्षेत्रफळावर वसलेले नाही. त्यामुळेच धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
मिठागरांच्या जमिनीवर वाजवी दरातील घरबांधणी करण्याचा मनोदय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. मात्र मिठागरांच्या जमिनींवर घरबांधणी झाल्यास पूर्व उपनगरांतील मोठ्या प्रमाणावरील मोकळ्या जागांना नख लागण्याची दाट शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास ही मिठागरे आणि त्यांच्या सभोवतालची तिवरांची जंगले पाण्याला थोपवण्याचे काम करतात. एक प्रकारे संरक्षक भिंत म्हणून त्यांचे योगदान आहे. भविष्यात मिठागरे नष्ट झाल्यास ही नैसर्गिक संरक्षक भिंत नाहीशी होणार आहे.
मिठागरांच्या जमिनी पाणथळ जागा असल्याने त्यावर बांधकामे करता येणार नाहीत, असा अहवाल एमएमआरडीएने २०१६ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणाअंती दिला होता. मिठागरांच्या एकूण जागेपैकी फक्त २५ एकर जागेवरच बांधकाम होऊ शकते, असेही या अहवालात म्हटले होते. म्हणजेच मिठागरांच्या जागेवर बांधकामे करता येणे शक्य नाही, असेच या अहवालातून सुचवण्यात आले होते. मात्र केंद्रीय पर्यावरण खात्याने नव्याने सर्वेक्षण करण्याचा आदेश दिल्याने शंका निर्माण झाली आहे. जी मिठागरे एक हजार एकर जमिनीवर असतील, त्याच जागा पाणथळ जागा समजाव्यात, अशी नवी व्याख्या या खात्याने केल्याचे समजते. मुंबईत ५४०० एकर क्षेत्रावर मिठागरे आहेत. मात्र कोणतेही मिठागर एक हजार एकराच्या सलग क्षेत्रफळावर नाही. प्रत्येक मिठागर ४०० ते ५०० एकराच्या तुकड्यांवर आहे. साहजिकच केंद्राच्या नव्या व्याख्येत ही मिठागरे पाणथळ जागा म्हणून येत नाहीत.
>>'सीआरझेड'चे कवच
'पाणथळ जागा' या व्याख्येमुळे मिठागरांना सीआरझेड कायद्याचे कवच लाभले होते. परिणामी या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची बांधकामे करता येत नाहीत. नव्या व्याख्येने मात्र मिठागरांचे अस्तित्व धोक्यात येऊन बांधकामांना मोकळे रान मिळण्याची भीती आहे. अर्थात या जमिनींवर सध्या तरी घरबांधणीचा कोणताही मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला नाही. घरबांधणी करण्यासाठी केंद्र सरकारला नियमात बदल करावे लागतील. त्यादृष्टीनेच नव्याने हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
>>मुंबईतील मिठागरे
पूर्व उपनगर
घाटकोपर, चेंबूर, ट्रॉम्बे, मंडाळे, तुर्भे, आणिक-वडाळा, कांजुरमार्ग, भांडुप, नाहुर आणि मुलुंड
पश्चिम उपनगर
मालवणी, दहिसर, मिरा-भाईंदर आणि विरार