अ‍ॅपशहर

अवयवप्रत्यारोपणासाठी विमाकवच नाहीच

करोना संसर्गाच्या काळामध्ये सरकारी आरोग्य योजनांमध्ये विविध प्रकारचे बदल झाले. त्यात समाविष्ट असलेल्या आजारांची व्याप्तीही वाढली. मात्र बदलत्या जीवनशैलीसह अन्य कारणांमुळे निकामी होणाऱ्या अवयवांच्या प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे विमाकवच देण्यात येत नाही.

Authored byशर्मिला कलगुटकर | महाराष्ट्र टाइम्स 24 Dec 2020, 2:36 pm
मुंबई : करोना संसर्गाच्या काळामध्ये सरकारी आरोग्य योजनांमध्ये विविध प्रकारचे बदल झाले. त्यात समाविष्ट असलेल्या आजारांची व्याप्तीही वाढली. मात्र बदलत्या जीवनशैलीसह अन्य कारणांमुळे निकामी होणाऱ्या अवयवांच्या प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे विमाकवच देण्यात येत नाही. मूत्रपिंड प्रत्यारोपणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारच्या प्रत्यारोपणासाठी ही सुविधा उपलब्ध नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अवयवप्रत्यारोपणासाठी विमाकवच नाहीच


फुफ्फुस, हात, डोळे, यकृत, हृदय अशा विविध प्रकारच्या अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी विमायोजनेची सुविधा असावी यासाठी सातत्याने वैद्यकीय तज्ज्ञांकडून पाठपुरावा केला जात आहे. सरकारी योजनांमध्ये याचा समावेश करावा का, यासंदर्भातील निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या माहितीनुसार, १९९७ ते २०१९ पर्यंत ५०५ दात्यांनी अवयवदान केले आहे. यात ८२२ जणांनी मूत्रपिंड, ३४४ जणांनी यकृत, ७७ जणांनी हृदय, २० जणांनी फुफ्फुस, तर दोन जणांनी स्वादुपिंड प्रत्यारोपण केले आहे. या प्रक्रिया प्रत्यारोपित (रिस्टोरेशन ) प्रकारामध्ये मोडत असल्यामुळे त्यांना विमाकवच देता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो.

करोना काळामध्ये सर्वांना आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी म. फुले योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली. प्रतिजैविकांच्या अतिरिक्त वापरामुळे तसेच करोना काळामध्ये निर्माण झालेल्या अन्य गुंतागुंतीमुळे अवयव निकामी होण्याची शक्यता टाळता येत नाही. इतर कारणांमुळेही अवयवप्रत्यारोपणाची गरज सातत्याने वाढली असतानाही या योजनांमध्ये ही तरतूद करण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षा म. फुले योजनेचे प्रमुख डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केली.

मोनिकाच्या यशानंतर विचारणा सुरू

मुंबईमध्ये रेल्वे अपघातात दोन्ही हात निकामी झालेल्या मोनिका मोरे हिच्यावर हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी काही लाख रुपयांचा खर्च आला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाकडे अशा पन्नासहून अधिक हात गमावलेल्या व्यक्तींनी प्रत्यारोपणासाठी विचारणा केली आहे. या शस्त्रक्रियेला विमाकवच नसल्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर वैद्यकीय व्यवस्थापनाचा भार रुग्णांना घेता येणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मोनिकावर केलेली शस्त्रक्रिया ही पहिली असल्याने रुग्णालयाने त्यातील बराचसा आर्थिक भार उचलला, मात्र प्रत्येकवेळी ते शक्य होणार नाही, असे मोनिकावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. निलेश सातभाई यांनी 'मटा'ला सांगितले. अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे प्रमुख डॉ. एस. के. माथूर म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जोपर्यंत प्रत्यारोपणाच्या सुविधा सुरू होणार नाहीत तोपर्यंत आर्थिक भार कमी होणे शक्य नाही. ही सुविधा सरकारने गरजूंना द्यायला हवी. काळानुरूप अवयवप्रत्यारोपणाची गरजही वाढत जाईल. त्यामुळे हा वैद्यकीय खर्च सामान्यांच्या आवाक्यातला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासगी विमायोजनेसाठी मर्यादा

ज्या व्यक्तीला अवयव प्रत्यारोपित करण्यात येतो त्या व्यक्तीसाठी विमासुविधा दिली जाते. मात्र ज्याचा अवयव प्रत्यारोपित करण्यात येतो, त्या दात्याच्या शस्त्रक्रियेसाठी कोणतीही विम्याची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा खर्च कुणी करायचा हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज