म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
आरेमधील प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास हिरावून घेऊन तिथे कृत्रिम पद्धतीने प्राणिसंग्रहालय उभारले जाऊ नये या मागणीसह प्राण्यांच्या जगण्याच्या हक्कासाठी रविवारी वांद्र्याच्या कार्टर रोड येथे प्राणीप्रेमी आणि आरेसमर्थकांनी मोर्चा काढला. सर्कसमध्ये प्राण्यांच्या वापरावर बंदी, मांसाहार, दूध, चीज वर्ज्य करणे अशा अनेक मुद्द्यांबाबत यावेळी मतप्रदर्शन करण्यात आले.
आरेमध्ये प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी करार झाला आहे. आधी आरेची १२० एकर जागा या संग्रहालयासाठी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्यात आणखी १२० एकर जमिनीचा समावेश करण्यात आला. प्राणिसंग्रहालय हे मनोरंजनाच्या उद्देशाने उभारायचे आहे. त्यामुळे प्राण्यांचा वापर हा मनोरंजनासाठी होऊ नये, अशी भूमिका या मोर्च्यात सहभागी झालेल्यांनी घेतली. आरेसमर्थक हर्षद तांबे यांनी, 'आरेसारख्या जंगल भागामध्ये प्राणिसंग्रहालय उभारणे म्हणजे समुद्रात मत्स्यालय उभारण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया देत आपल्या मनोरंजनासाठी प्राण्यांना बंदिवासात का ठेवयाचे?' असा प्रश्न उपस्थित केला.
'आरेमध्ये मेट्रोसाठी कारशेड उभारल्यावर या परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्यांच्या अधिवासात जाण्यासाठी जागा न मिळाल्याने गाडीखाली येऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. अशाच प्रकारे या नैसर्गिक अधिवासामध्ये काँक्रिटीकरणाला चालना मिळाली तर या भागात राहणारे आणखी इतर अनेक प्राण्यांचे विस्थापन होईल. बिबळ्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. हे प्राणी आजूबाजूच्या निवासी वस्तीमध्ये आसऱ्यासाठी गेले तर त्यांना पकडण्याची वेळ येईल. आरेमध्ये काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून त्यांचेच घर हिरावून मग त्यांना पकडून पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येईल. त्यामुळे या माध्यमातून माणूस प्राण्यांच्या हक्कांवर गदा आणत आहे. हे टाळण्यासाठी प्राणिसंग्रहालय किंवा इतर कोणतेही काँक्रिटीकरण करून प्राण्यांचा जगण्याचा हक्क हिरावला जाऊ नये', असे आवाहन मुंबईकर प्राणीप्रेमींनी केले. फरच्या वस्तू, त्यांसाठी होणारी प्राण्यांची हत्या, हस्तिदंत, प्राण्यांची तस्करी, दुधासाठी प्राण्यांचे होणारे हाल यासंदर्भातही जनजागृती गरजेची असून यामागचे वास्तव लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
(फोटो- bandra protest 1, 2 Q मध्ये )