अ‍ॅपशहर

नव्या ऑफरची वेळ निघून गेलीय, सेल संपलाय; भाजपला राऊतांचा टोला

काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडीचं समीकरण जुळल्यानंतर अखेरचा प्रयत्न म्हणून भाजपनं शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याच्या वृत्ताचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी खंडन केलं आहे. 'शिवसेनेला कोणीही कसलीही ऑफर दिलेली नाही,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2019, 10:36 am

नव्या सरकारची आज घोषणा; पाच वर्षं सेनेचाच मुख्यमंत्री?

मुंबई: काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडीचं समीकरण जुळल्यानंतर अखेरचा प्रयत्न म्हणून भाजपनं शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याच्या वृत्ताचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी खंडन केलं आहे. 'शिवसेनेला कोणीही कसलीही ऑफर दिलेली नाही. नव्या ऑफरची वेळ आता निघून गेली आहे. सेल संपलाय,' असा सणसणीत टोला राऊत यांनी भाजपला हाणला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sanjay Raut


वाचा: शरद पवार-उद्धव यांच्यात मध्यरात्रीपर्यंत खलबतं

भाजपला दूर ठेवून राज्यात सत्ता स्थापन करण्यावर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये एकमत झालं आहे. तिन्ही पक्षाच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असून आज नवी आघाडी सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. हे सगळं सुरू असतानाच भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवल्याचं समजतं. गुरुवारी रात्री भाजपकडून 'मातोश्री'ला तसा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं वृत्त एका वृत्तपत्रानं दिलं आहे.


संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे वृत्त खोडून काढलं. 'शिवसेनेला कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही. याबाबतच्या बातम्या निराधार आहेत. मुळात नव्या ऑफरची वेळ आता निघून गेली आहे. सेल संपलाय. आता कुणी इंद्राचं आसन जरी दिलं तरी शिवसेना घेणार नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 'शिवसेनेनं महाराष्ट्राच्या स्वाभिनासाठी वेगळा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची कुंडली शिवसेनाच ठरवणार आणि सगळे निर्णय मुंबईतच होणार, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

विधानसभेच्या निकालानंतर सत्ता वाटपाच्या वादातून भाजप-शिवसेना युती तुटली. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरल्यानं व भाजपनं त्यास नकार दिल्यानं सत्तेचा पेच निर्माण झाला. भाजपनं शब्द न पाळल्याचा आरोप करत शिवसेनेनं थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करून सरकार बनविण्याची तयारी केली आहे. त्यामुळं भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या हट्टापायी भाजपनं हातातोंडाशी आलेली सत्ता घालवली, अशी भावना काही आमदारांमध्ये आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपनं काल अखेरच्या क्षणी शिवसेनेला नवा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यात तथ्य नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज