म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुरुवारी रात्री 'मातोश्री' निवासस्थानी युतीबाबत झालेला तपशील दिल्लीतील भाजप नेतृत्वाला कळविला जाणार असून, त्यानंतर युतीबाबतचा पुढील निर्णय अपेक्षित असल्याचे कळते.
गेले काही महिने युतीबाबत पदड्याआडून चर्चा झाल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस थेट 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. या भेटीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. मुख्यमंत्री 'मातोश्री'वर येणार याची कल्पना तिथल्या अनेकांना नव्हती. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई एवढेच उपस्थित होते. यावेळी, भाजपच्या ताब्यातील लोकसभेच्या ज्या विद्यमान जागा शिवसेना मागत होती, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो खुलासा केल्याचे कळते. पालघर जागेबाबतचा आग्रह आता शिवसेनेने सोडून द्यावा याविषयीही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल्याचे कळते.
विधानसभेच्या निम्म्यानिम्म्या जागा वाटून घ्यायच्या असे ठरले असले तरी त्या जागा कोणत्या असाव्यात, मित्रपक्षांना द्यायच्या जागा कोणत्या असाव्यात याविषयीही जुजबी चर्चा झाल्याचे कळते. लोकसभेनंतर भाजप विधानसभेला जाणूनबुजून युती तोडणार नाही याविषयीची भूमिकाही यावेळी मांडण्यात आल्याचे कळते. पुलवामा हल्ल्याच्या बातमीने देशात खळबळ उडाल्याने ही बैठक आटोपती घेण्यात आली. बैठकीतील चर्चा दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाच्या कानावर घातली जाईल, त्यांच्याकडून आलेल्या प्रतिसादानंतर पुढची बोलणी करू, असे सांगतच मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील 'मातोश्री'वरून बाहेर पडल्याचे समजते.
...तर युतीसाठी तयार!
मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न, संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्न आणि मुंबईतील काही समस्यांकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. नाणार प्रकल्पापासून इतर अनेक गोष्टींवर शिवसेना जनतेच्या पाठीशी ठाम असून, सरकार म्हणून भाजपने या भूमिकेला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे त्यांनी भाष्य केल्याचे कळते. या सर्व प्रश्नांवर भाजप आपल्यासोबत असेल तर आपण युती करण्यास तयार असल्याबाबतची भूमिकाही त्यांनी मांडली. या भूमिकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुरुवारी रात्री 'मातोश्री' निवासस्थानी युतीबाबत झालेला तपशील दिल्लीतील भाजप नेतृत्वाला कळविला जाणार असून, त्यानंतर युतीबाबतचा पुढील निर्णय अपेक्षित असल्याचे कळते.
गेले काही महिने युतीबाबत पदड्याआडून चर्चा झाल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस थेट 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. या भेटीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. मुख्यमंत्री 'मातोश्री'वर येणार याची कल्पना तिथल्या अनेकांना नव्हती. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई एवढेच उपस्थित होते. यावेळी, भाजपच्या ताब्यातील लोकसभेच्या ज्या विद्यमान जागा शिवसेना मागत होती, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो खुलासा केल्याचे कळते. पालघर जागेबाबतचा आग्रह आता शिवसेनेने सोडून द्यावा याविषयीही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल्याचे कळते.
विधानसभेच्या निम्म्यानिम्म्या जागा वाटून घ्यायच्या असे ठरले असले तरी त्या जागा कोणत्या असाव्यात, मित्रपक्षांना द्यायच्या जागा कोणत्या असाव्यात याविषयीही जुजबी चर्चा झाल्याचे कळते. लोकसभेनंतर भाजप विधानसभेला जाणूनबुजून युती तोडणार नाही याविषयीची भूमिकाही यावेळी मांडण्यात आल्याचे कळते. पुलवामा हल्ल्याच्या बातमीने देशात खळबळ उडाल्याने ही बैठक आटोपती घेण्यात आली. बैठकीतील चर्चा दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाच्या कानावर घातली जाईल, त्यांच्याकडून आलेल्या प्रतिसादानंतर पुढची बोलणी करू, असे सांगतच मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील 'मातोश्री'वरून बाहेर पडल्याचे समजते.
...तर युतीसाठी तयार!
मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न, संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्न आणि मुंबईतील काही समस्यांकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. नाणार प्रकल्पापासून इतर अनेक गोष्टींवर शिवसेना जनतेच्या पाठीशी ठाम असून, सरकार म्हणून भाजपने या भूमिकेला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे त्यांनी भाष्य केल्याचे कळते. या सर्व प्रश्नांवर भाजप आपल्यासोबत असेल तर आपण युती करण्यास तयार असल्याबाबतची भूमिकाही त्यांनी मांडली. या भूमिकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते.