मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
भारताने कधीच कोणत्या देशावर हल्ला नाही केला. पण जर कोणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहत असेल, तर आपल्या भारतीय सैनिकांमध्ये हा हल्ला परतवून लावण्याची ताकद आहे. 'ऑपरेशन विजय'मध्ये पाकिस्तानला वाटले होते की, भारतीय सैनिक त्यांच्यापर्यंत पोहचू शकणार नाहीत, पण भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन मोहीम यशस्वी केली. त्यामुळेच 'ऑपरेशन विजय' हा शौर्याचा अभिलेख आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे काढले.
अथर्व फाऊंडेशनतर्फे षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार, आ. मंगलप्रभात लोढा, आ. राज पुरोहित, लेफ्टनंट जनरल एस. के. पराशर, विंग कमांडर जगमोहन नाथ, सनदी अधिकारी संजय भाटिया, ऑपरेशन विजयमध्ये हौतात्म्य आलेल्यांचे कुटुंबीय, नातेवाईक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा उपस्थित मान्यवरांना देताना म्हणाले की, कारगिल विजयाला २० वर्ष पूर्णे होत असून भारतासाठी आज गौरवाचा दिवस आहे. आजच्या दिवशी 'ऑपरेशन विजय'मधील शहिदांचे बलिदान लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपले भविष्य सुरक्षित राहावे म्हणून या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या जवानांनी तिरंगा नेहमीच उंच फडकत ठेवला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासाकडे वाटचाल करत आहे. आपण हा विकास आपला देश सुरक्षित आणि बलशाली आहे म्हणून करू शकलो आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र शासन सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी रक्कम पाच लाख रुपयांवरून एक कोटींपर्यंत करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारमार्फत शहीद कुटुंबीयांना दोन एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जमीन खरेदीवर स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला आहे. राज्य सरकारने १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी शहीद कुटुंबियांना सन्मानपूर्वक सरकारी कार्यक्रमांना बोलवण्याची पद्धत सुरू केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.