- तिसऱ्या दिवशीही सरकारविरोधी घोषणाबाजी
- राज्याचा अर्थसंकल्प फोडण्याचा पुन्हा आरोप
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही बुधवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात जाहीर होण्याच्या आधीच तो अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
सकाळी अधिवेशन सुरू होण्याआधी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करीत जोरदार निषेध करण्यात आला. याशिवाय राज्यातील गंभीर दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी विरोधी सदस्यांनी आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षाचे सदस्य विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचे आगमन झाले. त्यावेळी 'नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. त्यावेळी पुढे येऊन एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्याशी हस्तांदोलन केले.
विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 'फुटलेल्या बजेटची चौकशी झालीच पाहिजे', अशी मागणी करतानाच 'भाजप-सेना सरकार हाय हाय', 'गरीब शेतकरी, धनगर, मुस्लिमांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', 'प्रसिध्दीसाठी हपापलेल्या फडणवीस-मुनगंटीवार सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा देण्यात आल्या. 'कोणाच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प फोडला', असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला. दरम्यान, 'ट्विटचे पुरावे दिले तर चौकशी करतो', असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी दिले.