अ‍ॅपशहर

‘आयारामां’ना संधी!

इतर पक्षातील उमेदवार निवडून येण्याची भक्कम शक्यता असेल तर प्रसंगी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी डावलून त्या उमेदवाराला पक्षात घेण्याची रणनीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखल्याचे कळते. कोणत्याही परिस्थितीत एकीकडे पक्षाचे आमदार वाढवायचे आणि दुसरीकडे पक्षाचे उमेदवार पळवून नेणाऱ्या अन्य पक्षांना धक्का द्यायचा, अशा प्रकारे 'एका दगडात दोन पक्षी' मारण्याची खेळी यातून शिवसेना नेतृत्व साधणार असल्याचे कळते.

Sanjay Vhanmane | Maharashtra Times 31 Aug 2018, 3:46 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम opportunity for import candidate
‘आयारामां’ना संधी!
मुंबई: इतर पक्षातील उमेदवार निवडून येण्याची भक्कम शक्यता असेल तर प्रसंगी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी डावलून त्या उमेदवाराला पक्षात घेण्याची रणनीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखल्याचे कळते. कोणत्याही परिस्थितीत एकीकडे पक्षाचे आमदार वाढवायचे आणि दुसरीकडे पक्षाचे उमेदवार पळवून नेणाऱ्या अन्य पक्षांना धक्का द्यायचा, अशा प्रकारे 'एका दगडात दोन पक्षी' मारण्याची खेळी यातून शिवसेना नेतृत्व साधणार असल्याचे कळते.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मतदारसंघातील आढावा घेत आहेत. या आढावा बैठकांमधून ते शिवसेनेच्या नेते व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या तोडीस तोड रणनीती उभारण्याच्या सूचना देत आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना उमेदवार थोडक्या मतांनी पडत असल्याच्या आकडेवारीवर या बैठकांमध्ये जोर दिला जात आहे. अशा अनेक मतदारसंघांमध्ये थोडक्या मतांनी निवडून येणाऱ्या अन्य पक्षांच्या उमेदवारांनी शिवसेनेतून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केलेले असतात, पण 'तो पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता नाही' या मुद्यावर भर देत त्याला उमेदवारी नाकारली जाते. मात्र, शिवसेनेच्या प्रत्येक निष्ठावान सैनिकाला न्याय द्यायचा असेल तर राज्यात शिवसेनेची सत्ता असायला हवी. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढायला हवी, अशा शब्दांत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना समजावत आहेत.

'गेल्या निवडणुकीदरम्यान अन्य पक्षातील जवळपास २० ते २५ उमेदवार तिकिटासाठी माझ्याकडे आले होते. त्यांना केवळ पक्षातील उमेदवार नसल्याने आपण उमेदवारी नाकारली, मात्र तेच नंतर इतर पक्षातून निवडून आले', असे सांगत, यावेळी निवडून येणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देण्याच्या स्पष्ट सूचना उद्धव यांनी मंगळवारी संपर्कप्रमुखांना दिल्याचे कळते.

कारणे सांगणाऱ्यांची कानउघाडणी…

उमेदवाराला तिकीट देताना प्रत्येक उमेदवार, संबंधित मतदारसंघाचे संपर्कप्रमुख तसेच इतर पदाधिकारी निवडून येण्याची शंभर टक्के खात्री देत असतात. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाची कारणे देताना, समोरच्या उमेदवाराने पाच-पंचवीस कोटी रुपये खर्च केले, ईव्हीएम मशिनचा घोटाळा केला, अशा सबबी बहुसंख्य उमेदवार तसेच पदाधिकारी सांगतात. याबाबत उद्धव ठाकरे यांनी बैठकांमध्ये जोरदार कानउघाडणी सुरू केली आहे. 'समोरचा उमेदवार करोडो रुपये खर्च करत असताना ते तुम्हाला कसे दिसत नाहीत? त्यांच्या तक्रारी तुम्ही का करीत नाहीत?' अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली.

विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली…

राज्यात इतरत्र जशी संघटना मजबूत आहे तशी परिस्थिती विदर्भात नाही. माझेही काही प्रमाणात याकडे दुर्लक्ष झाले आहे, मात्र आता आपण सर्वांनी एकत्रित येऊन विदर्भतील पक्षसंघटना मजबूत करू या, असे उद्धव म्हणाल्याचे कळते. विदर्भात पक्षातील नोंदणीचे गणित कागदावर मांडताना खरी परिस्थिती मांडा, तरच नेमका अंदाज येईल, असेही त्यांनी सांगितल्याचे कळते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज