अ‍ॅपशहर

Aurangabad Rename: 'एखादी गोष्ट जमत नसली की शिवसेना अशी पळवाट काढते'

औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या प्रश्नी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या शिवसेनेवर प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2021, 11:35 am
मुंबई: औरंगाबादचं 'संभाजीनगर' असं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण सध्या तापलं आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसनं नामांतराला विरोध केल्यानं त्यात भर पडली असून शिवसेना व भाजपमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला प्रशासकीय प्रक्रिया समजावून सांगितली आहे. 'एखादी गोष्ट जमत नसली की शिवसेना पळवाट काढते,' असा सणसणीत टोलाही त्यांनी हाणला आहे. (Shivena, BJP on Renaming of Aurangabad as Sambhaji Nagar)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sanjay Raut-Pravin Darekar


वाचा: कोल्हापूर महापालिका निवडणूक: प्रत्येक पक्षाने नेमले कारभारी

औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर येताच शहराच्या नामांतराच्या मागणीनं उचल खाल्ली आहे. शिवसेनेनं नामांतराची जोरदार मागणी केली आहे. तर, राज्य सरकारमधील शिवसेनेचा मित्रपक्ष काँग्रेसनं कडाडून विरोध केला आहे. त्यावरून भाजपनं शिवसेनेला घेरलं आहे. शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी, असं भाजपनं म्हटलं आहे. त्यास 'सामना'च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देताना शिवसेनेनं भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या आणि औरंगजेब रोडचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रोड असं नामकरण करताना भाजपनं संभाजीनगरचं नामांतर का शिल्लक ठेवलं? राज्यात व केंद्रात भाजपचं सरकार असतानाही हे का झालं नाही?,' असा प्रश्न शिवसेनेनं केला होता.

प्रवीण दरेकर यांनी त्यास उत्तर देताना शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. 'प्रत्येक गोष्टीची एक प्रशासकीय प्रक्रिया असते. एखाद्या शहराचे नामांतर करायचे असल्यास तेथील महापालिकेत प्रस्ताव मंजूर होणं गरजेचं आहे. त्यानंतर तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जातो व नंतर केंद्राकडे जातो. ही प्रक्रिया समजून न घेता प्रत्येक गोष्ट भाजपवर ढकलून मोकळं व्हायचं ही सवय शिवसेनेला लागली आहे. औरंगाबाद महापालिका शिवसेनेकडं आहे. तिथं ठराव करा. राज्य मंत्रिमंडळाकडं प्रस्ताव पाठवा आणि मग तिथून केंद्राकडं पाठवा. तिथं काही मदत लागल्यास भाजप नक्कीच करेल. मात्र, काँग्रेसनं नामांतराला विरोध केलाय. त्यामुळं शिवसेनेची अडचण झालीय. त्यापासून पळवाट म्हणून संजय राऊत भाजपला दोष देताहेत,' असं दरेकर म्हणाले.

वाचा: ईडीविरोधात शिवसेना आक्रमक; शेकडो शिवसैनिक मुंबईत येणार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज