अ‍ॅपशहर

पंकजांना एका तासासाठी मुख्यमंत्री करावं: शिवसेना

मराठा आरक्षण आणि त्यावरून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाचा आधार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिरकस टीका केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात आणि असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर पंकजा यांना एका तासासाठी का होईना, पण मुख्यमंत्रिपद बहाल केलं पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jul 2018, 7:45 am
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm-devendra-fadnavis-uddhav


मराठा आरक्षण आणि त्यावरून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाचा आधार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिरकस टीका केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात आणि असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर पंकजा यांना एका तासासाठी का होईना, पण मुख्यमंत्रिपद बहाल केलं पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात. ते खरे असेलही. कारण मराठा क्रांतीने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील. म्हणून मुख्यमंत्र्यांनी फाईल कुठे आहे हे शोधून आता तरी फायलीचा लाल दोरा सोडावा, असा टोला ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना लगावला.

ठळक मुद्दे:

>> पंकजा मुंडे यांनी शिवरायांची शपथ घेऊन सांगितले आहे की, 'मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारात चालढकल केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय?

>> पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये? असाही प्रश्न आंदोलकांना आता पडला असेल.

>> पंकजा मुंडेंची भूमिका समजून घेतली पाहिजे. त्या जे बोलत आहेत त्यात राजकारण आहे असे कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.

>> मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाईन, असे पंकजांनी सांगितले. मग त्यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत जाऊन, पंतप्रधानांना भेटून मराठा आरक्षणाचा तिढा का सोडवीत नाहीत?

>> पंतप्रधान मोदी हे बऱ्याचदा दिल्लीत नसतात व राज्यांतील, देशातील प्रश्नांत त्यांना फारसा रस उरलेला नाही. आंदोलने चिरडून टाकायची हे सरकारी धोरण आहे.

>> गुजरातमध्ये पटेल समाजाचे आरक्षण आंदोलन असेच मोडून काढले. जे गुजरातमध्ये झाले नाही ते महाराष्ट्रात होईल काय, हा प्रश्नच आहे.

>> हार्दिक पटेलवर देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे लावून भाजप सरकारने त्याला तुरुंगात डांबले. महाराष्ट्रात मात्र अवघा मराठा समाजच या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे इथे सरकारची फजिती झाली.

>> बरे, हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जावे, तर पंतप्रधान बऱ्याचदा परदेशात असतात. त्यामुळे दिल्लीत जाऊन कोणत्या भिंतीवर डोके फोडायचे, असा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल.

>> सत्तेवर येण्यासाठी जी अफाट वचने व आश्वासने दिली जातात तीच पुढे त्रासदायक ठरतात. धनगर समाजाला, मराठा समाजाला आश्वासन दिले ते आता पूर्ण करावे लागेल. नाही तर आरक्षणाची फाईल पंकजा मुंडे यांच्या टेबलावर पाठवून विषयास पूर्णविराम द्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज