अ‍ॅपशहर

कुपोषित बालकांचे सॅम, मॅममधील प्रमाण वाढते

राज्य सरकार आणि आरोग्ययंत्रणा कुपोषणाच्या उच्चाटनासाठी पालघर जिल्ह्यासह राज्यात सक्षमपणे काम करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र पालघरमधील विक्रमगड, जव्हार, वाडा आणि मोखाडा या आदिवासी तालुक्यांमध्ये तीव्र कुपोषणग्रस्त (मॅम) आणि अतितीव्र कुपोषणग्रस्त (सॅम) मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आरोग्यमंत्री अध्यक्ष असलेल्या टास्क फोर्सच्याच अहवालात समोर आले आहे.

Maharashtra Times 27 Jun 2017, 12:20 am
मुंबई: राज्य सरकार आणि आरोग्ययंत्रणा कुपोषणाच्या उच्चाटनासाठी पालघर जिल्ह्यासह राज्यात सक्षमपणे काम करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र पालघरमधील विक्रमगड, जव्हार, वाडा आणि मोखाडा या आदिवासी तालुक्यांमध्ये तीव्र कुपोषणग्रस्त (मॅम) आणि अतितीव्र कुपोषणग्रस्त (सॅम) मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आरोग्यमंत्री अध्यक्ष असलेल्या टास्क फोर्सच्याच अहवालात समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम percentages of malnourished children in sam and mam
कुपोषित बालकांचे सॅम, मॅममधील प्रमाण वाढते


जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या निर्देशकांनुसार मॅम आणि सॅममुळे शून्य ते पाच वयोगटातील बालकांना मृत्यूचा धोका १० पट अधिक असतो. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास जव्हारमध्ये अतितीव्र कुपोषित गटात ९२४ मुलांचा समावेश आहे, तर मोखाड्यात हेच प्रमाण ३२०, विक्रमगडमध्ये ९१८ आणि वाड्यात ६६७ आहे, असे टास्क फोर्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बालमृत्यू थांबवायचे असल्यास मुळात गर्भवतींच्या आहारापासून सुरुवात करायला हवी. मातेला पोषक आहार मिळाला, तर गर्भाचे कुपोषण होणार नाही. राज्यात सर्च, खोज, तथापि यांसारख्या आरोग्याच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्थांनी हीच मागणी वारंवार लावून धरली आहे.

बालमृत्यूचे ग्रहण कायम

गेल्यावर्षी पालघर जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यूंची नोंद जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झाली होती. एक वर्षात येथे सक्षम आरोग्ययंत्रणा उभी न राहिल्याने २०१६-१७ मध्येही जुलैमध्ये ६६, तर ऑगस्टमध्ये ९३ बालमृत्यूंची नोंद झाल्याचे हा अहवाल सांगतो. कमी दिवसांची, कमी वजनाची मुले न्युमोनिया, अॅस्फिक्यिया, तीव्र जंतुसंसर्ग या कारणांमुळे मृत्युमुखी पडत असल्याची नोंद झाली आहे. पालघरमधील बालमृत्यूंची वयानुसार शून्य ते २८ दिवसांच्या नवजात अर्भकांच्या मृत्यूची संख्या इतर वयोगटापेक्षा अधिक आहे. २९ दिवस ते एक वर्ष आणि एक ते सहा वर्षे वयोगटातील बालमृत्यूंची संख्याही येथे इतर तालुक्यांपेक्षा अधिक आहे.

सरकारने पडताळणी करावी

गेल्या महिन्यात या माध्यमातून ७० मुलांची तपासणी करण्यात आली होती. पैकी १० सॅम तर तितक्याच मुलांचा मॅम गटात समावेश होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वैद्यकीय शिबिरामधील ३४ पैकी ११ मुलांची नोंद सॅम-मॅम वर्गात करण्यात आली होती. वैद्यकीय शिबिरांमध्ये हे प्रमाण इतके वाढलेले दिसत असेल तर पालघर जिल्ह्यांमध्ये हेच प्रमाण किती असेल याची पडताळणी सरकारने करायला हवी, असे मत स्नेहा घरत व्यक्त करतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज