धोका कायम!
शैलेश जाधव
अंधेरी येथील गोखले पुलाशेजारचा पादचारी पूल कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वे बारा तासांसाठी पूर्णपणे थांबली होती. अजूनही पश्चिम रेल्वेवर काही ठिकाणी मोडकळीस आलेली बांधकामे आहेत ज्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होऊ शकते. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे, सांताक्रूझ आणि चर्नी रोड या स्टेशनवर दुरवस्थेमुळे बंद करण्यात आलेले पूल आणि तिकीट खिडकी आहे. या मोडकळीस आलेल्या बांधकामांना धक्का लागल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१) सांताक्रूझ स्थानकामधून पूर्वेकडे बाहेर येण्यासाठी नवीन पूल बांधण्यात आल्यामुळे जुना पूल बंद करण्यात आला आहे. या पुलावर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वायरी पसरलेल्या आहेत.
२) वांद्रे स्थानकातून खेरवाडीकडे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलाचा अर्धा भाग वापरात असून अर्धा भाग बंद करून नवीन पुलाला जोडण्यात आला आहे. या पुलाचा बंद असलेला भाग पूर्ण गंजलेला असून त्याच्या पायऱ्यांचा भाग तुटलेला आहे. या पुलाखालून हार्बर रेल्वेची वाहतूक चालते.
३) चर्नी रोड येथील महर्षी कर्वे मार्गावरील पादचारी पूल तोडण्यात आला आहे. मात्र या पुलाला लागून असलेली तिकीट खिडकी अजूनही रेल्वे ट्रॅकच्या मधोमध उभी आहे. या तिकीट खिडकीची दुरवस्था झाली असून याच तिकीट खिडकीवर मोबाइल टॉवरचे बांधकाम करण्यात आले आहे.