म. टा. प्रतिनिधी, मुंबई
नाटककार प्रेमानंद गज्वी यांना 'द बुद्धा' नाटकासाठी मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे देण्यात येणारा जयवंत दळवी स्मृती पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले. ११ हजार १११ रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी या नाटकातून गज्वी ज्या ताकदीने बौद्ध तत्त्वज्ञानाला भिडले ते महत्त्वाचे आहे, अशा शब्दांमध्ये प्रा. पुष्पा भावे यांनी त्यांच्या लेखणीचे कौतुक केले.
यशोधरा, राहुल आणि बुद्ध यांच्या संवादातून बौद्ध तत्त्वज्ञान मांडले जाते आणि दुसऱ्या बाजूला यशोधरेने बुद्धाला जे प्रश्न विचारले त्यातून तिचा वैचारिक आणि भावनिक प्रवास दाखवला आहे, तो लक्षणीय आहे, अशा शब्दांमध्ये प्रा. भावे यांनी या नाटकाचे विश्लेषण केले. 'द बुद्धा'सारख्या काव्यनाटकाला हा पुरस्कार मिळाल्याने विशेष आनंद झाला असून, असे काव्यनाटक आजवर नाटकाच्या ताफ्यात आलेले नाही. नाट्यमाध्यमात रुळलेल्या गज्वींना असे काव्यनाटक लिहावेसे वाटले हे महत्त्वाचे आहे, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. विजय तापस यांनी व्यक्त केले.
निलिमा भावे, दीपक घारे, जयप्रकाश लब्धे या परीक्षकांनी गज्वी यांची या पुरस्कारासाठी निवड केली. यावेळी बोलताना घारे यांनी गज्वींच्या नाट्यविषयक भूमिकेचा हा गौरव आहे, अशी भावना व्यक्त केली, तर या पुरस्कार सोहळ्याला उत्तर देताना गौतम बुद्धांनी जगाला खूप काही दिले आणि बुद्धाची शिल्पे हा भारतीय शिल्पकलेतील अमूल्य वारसा आहे, असे गज्वी यांनी सांगितले.