अ‍ॅपशहर

एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी मंत्रालयात लोकांच्या रांगा; कक्षाबाहेर दीडशे ते दोनशे नागरिक

सायंकाळचे पावणेआठ वाजले तेव्हा नियोजित कार्यक्रमाबद्दल त्यांना आठवण झाली. मात्र, आपल्याला भेटायला समिती कक्षाबाहेर किमान दीडशे ते दोनशे नागरिक उपस्थित असल्याचे त्यांना कळले.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 9 Oct 2022, 10:03 am
मुंबई : मंत्रालयात एरवीपेक्षा मंत्रीमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या सर्वधिक असते. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून सर्वसामान्य नागरिक भेटायला येतात. त्यामुळे अनेकदा मंत्रालयातील नियोजित वेळ निघून गेल्यानंतरही कामासाठी भेटीला आलेल्यांची मोठी रांग मंत्र्यांच्या कार्यालयांबाहेर दिसून येते. असाच काहीसा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शुक्रवारी घडला. गर्दी वाढल्यामुळे त्यांना थेट ‘ओव्हरटाइम’च करावा लागला. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले होते. त्यामुळे या दिवशी त्यांना भेटणाऱ्यांची गर्दी सर्वाधिक असल्याने रात्री साडेआठ वाजेपर्यंत ते मंत्रालयामधील त्यांच्या दालनामध्ये होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde
एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी मंत्रालयात लोकांच्या रांगा;


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेतल्यापासून जाहीर कार्यक्रमांमधून मी सामान्यांचा मुख्यमंत्री असल्याचे सांगत असतात. सामान्यपणे मंत्रालयामध्ये प्रत्येक खात्याच्या मंत्र्याला शहरी, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवा वर्गातील लोक कामांसाठी भेटायला येत असतात. मंत्रीमंडळ बैठकीच्या दिवशी मुख्यमंत्री आणि इतर मंत्री आवर्जून मंत्रालयात असल्याने जास्तच गर्दी दिसून येते. सर्वसामान्यांची निवेदने स्वीकारून त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली जातात. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी नियोजित परिवहन विभाग, मीरा-भाईंदर महापालिका विकासकामांचा आढावा, कोळी बांधवांच्या समस्यांबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर सायंकाळी विलेपार्ले येथे मुख्यमंत्र्यांचा नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी मंत्रालयाबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी भेटीसाठी आलेल्या अनेकांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ सर्वांची भेट घेतली. सायंकाळचे पावणेआठ वाजले तेव्हा नियोजित कार्यक्रमाबद्दल त्यांना आठवण झाली. मात्र, आपल्याला भेटायला समिती कक्षाबाहेर किमान दीडशे ते दोनशे नागरिक उपस्थित असल्याचे त्यांना कळले.

नियोजित कार्यक्रम असला, तरी सामान्यांना न भेटताच कसे जायचे, असा विचार करून त्यांनी सगळ्यांना भेटायचे ठरवले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात मुख्यमंत्री आले. त्यांनी समस्या घेऊन आलेल्या प्रत्येकाची भेट घेतली. निवेदने स्वीकारली. त्यावर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी सूचनाही लिहिल्या. सर्वांची भेट घेऊन झाल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयातून नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज