मुंबई : कर्नाटकमधील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक व भाजपशी जोडल्याबद्दल दाखल तक्रारीच्या सुनावणीसाठी २५ मार्चला न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना समन्स बजावले आहे.
गौरी लंकेश यांच्या २०१७मध्ये झालेल्या हत्येनंतर गांधी यांनी ट्विट करत ‘जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपविरोधात बोलतात त्यांना लक्ष्य केले जात असून प्रसंगी ठारही मारले जात आहे. कारण त्यांना देशावर त्यांची विचारसरणी थोपवायची आहे, असे म्हटले होते’, असे निदर्शनास आणत संघाच्या वतीने ऍड. धृतमान जोशी यांनी बेअदबीची तक्रार दाखल केली आहे. येचुरी यांच्या अशाप्रकारच्या विधानाविषयीही त्यांनी तक्रार केली आहे. त्यामुळे त्याविषयीच्या सुनावणीसाठी न्यायालयाने हे समन्स बजावले आहे.