म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मध्य रेल्वेवरील गोंधळ नेहमीचा असला तरी मंगळवारचा दिवस प्रवाशांसाठी खडतर ठरला. दादर-माटुंगा स्थानकामध्ये सकाळी सात वाजता आंदोलन सुरू झाले आणि थोड्याच वेळात त्याचे वृत्त सोशल मीडियावरून वाऱ्यासारखे फिरले. तेव्हाच नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडलेल्या आणि पडण्याच्या तयारीत असणाऱ्या मध्य रेल्वेवरील लाखो प्रवाशांच्या पोटात धस्स झाले. थोड्याच वेळात आंदोलन संपून लोकलसेवा पूर्ववत होतील, हा त्यांचा आशावाद धुळीला मिळाला. सकाळच्या वेळेत लोकल पकडण्यासाठी गेलेल्या लाखो मुंबईकरांना अनंत अडचणी, त्रासाला सामोरे जावे लागले. त्यात १००हून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्याने लोकल सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला. मध्य रेल्वेच्या गाड्या दिवसभर उशिराने सुरू होत्या.
आंदोलनाच्या दृष्टीने सर्वात सोपे लक्ष्य ठरलेल्या लोकल सेवेस मंगळवारी पुन्हा एकदा त्याचा अनुभव मिळाला. आंदोलनाची कोणतीही पूर्वसूचना वा कल्पना नसल्याने रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) नेहमीप्रमाणे ड्युटी बजावत होते. पण, सकाळी सातपासून आंदोलक रुळांवर येऊ लागल्यानंतर सर्व यंत्रणा सावध झाल्या. ठिकठिकाणांहून पोलिस बंदोबस्त मागवण्यात येऊ लागला. तोपर्यंत पोलिसांची संख्या कमी असल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली.
आंदोलकांनी मध्य रेल्वेवर दादर, सीएसएमटीपर्यंत पोहोचण्याचा नेमका मार्ग मुठीत धरल्याने यंत्रणा हतबल ठरली. सकाळी सातपासून साडे अकरापर्यंत सुरू असलेले आंदोलन मागे घेईपर्यंत साडेचार तास मध्य रेल्वे धावायची थांबली. कार्यालयात जाण्यासाठी निघालेले शेकडो प्रवासी मिळेल त्या वाटेने परत फिरले. दुसरीकडे लोकलच्या रांगा लागल्याने प्रवाशांमध्ये संताप, चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
प्रवाशांमध्ये संताप
प्रत्येकवेळी रेल्वेस वेठीस धरताना लाखो मुंबईकरांचा कधीतरी विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया घाटकोपरमधील मंगेश नवरे यांनी व्यक्त केली. भांडुपमध्ये राहणाऱ्या प्रकाश मोरे यांनी विद्याविहार स्थानकात उतरून पुन्हा घर गाठले. सकाळच्या गर्दीत लोकल डब्यात श्वास घेणेही कठीण असते. अशावेळी लोकल कित्येक तास थांबून राहताना आजारी, वृद्ध, शाळकरी मुलांचा तरी विचार केला पाहिजे, असे मत माटुंग्यातील दिनेश कोठारी यांनी व्यक्त केले.
आंदोलन मागे घेतल्यावरही हाल
स. ११.३० वाजता आंदोलन मागे घेतल्यानंतरही हाल सुरूच राहिले. सुमारे १०० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे स्थानकांवरील इंडिकेटरवरील आकडे निरुपयोगी ठरले. दुपारनंतरही कर्जत, कसारा, कल्याण, ठाण्याहून सीएसएमटीकडे येताना दोन ते तीन तासांचा प्रवास करावा लागला.
मध्य रेल्वेवरील गोंधळ नेहमीचा असला तरी मंगळवारचा दिवस प्रवाशांसाठी खडतर ठरला. दादर-माटुंगा स्थानकामध्ये सकाळी सात वाजता आंदोलन सुरू झाले आणि थोड्याच वेळात त्याचे वृत्त सोशल मीडियावरून वाऱ्यासारखे फिरले. तेव्हाच नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडलेल्या आणि पडण्याच्या तयारीत असणाऱ्या मध्य रेल्वेवरील लाखो प्रवाशांच्या पोटात धस्स झाले. थोड्याच वेळात आंदोलन संपून लोकलसेवा पूर्ववत होतील, हा त्यांचा आशावाद धुळीला मिळाला. सकाळच्या वेळेत लोकल पकडण्यासाठी गेलेल्या लाखो मुंबईकरांना अनंत अडचणी, त्रासाला सामोरे जावे लागले. त्यात १००हून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्याने लोकल सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला. मध्य रेल्वेच्या गाड्या दिवसभर उशिराने सुरू होत्या.
आंदोलनाच्या दृष्टीने सर्वात सोपे लक्ष्य ठरलेल्या लोकल सेवेस मंगळवारी पुन्हा एकदा त्याचा अनुभव मिळाला. आंदोलनाची कोणतीही पूर्वसूचना वा कल्पना नसल्याने रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) नेहमीप्रमाणे ड्युटी बजावत होते. पण, सकाळी सातपासून आंदोलक रुळांवर येऊ लागल्यानंतर सर्व यंत्रणा सावध झाल्या. ठिकठिकाणांहून पोलिस बंदोबस्त मागवण्यात येऊ लागला. तोपर्यंत पोलिसांची संख्या कमी असल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली.
आंदोलकांनी मध्य रेल्वेवर दादर, सीएसएमटीपर्यंत पोहोचण्याचा नेमका मार्ग मुठीत धरल्याने यंत्रणा हतबल ठरली. सकाळी सातपासून साडे अकरापर्यंत सुरू असलेले आंदोलन मागे घेईपर्यंत साडेचार तास मध्य रेल्वे धावायची थांबली. कार्यालयात जाण्यासाठी निघालेले शेकडो प्रवासी मिळेल त्या वाटेने परत फिरले. दुसरीकडे लोकलच्या रांगा लागल्याने प्रवाशांमध्ये संताप, चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
प्रवाशांमध्ये संताप
प्रत्येकवेळी रेल्वेस वेठीस धरताना लाखो मुंबईकरांचा कधीतरी विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया घाटकोपरमधील मंगेश नवरे यांनी व्यक्त केली. भांडुपमध्ये राहणाऱ्या प्रकाश मोरे यांनी विद्याविहार स्थानकात उतरून पुन्हा घर गाठले. सकाळच्या गर्दीत लोकल डब्यात श्वास घेणेही कठीण असते. अशावेळी लोकल कित्येक तास थांबून राहताना आजारी, वृद्ध, शाळकरी मुलांचा तरी विचार केला पाहिजे, असे मत माटुंग्यातील दिनेश कोठारी यांनी व्यक्त केले.
आंदोलन मागे घेतल्यावरही हाल
स. ११.३० वाजता आंदोलन मागे घेतल्यानंतरही हाल सुरूच राहिले. सुमारे १०० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे स्थानकांवरील इंडिकेटरवरील आकडे निरुपयोगी ठरले. दुपारनंतरही कर्जत, कसारा, कल्याण, ठाण्याहून सीएसएमटीकडे येताना दोन ते तीन तासांचा प्रवास करावा लागला.