म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई-नाशिक अंतर रेल्वे प्रवाशांना आता कमी वेळात कापणे शक्य होणार आहे. सीएसएमटी राजधानीच्या धर्तीवर राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेस ही पूश-पूल पद्धतीने मार्गस्थ करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दर्शवली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास मुंबई-नाशिक हा रेल्वे प्रवास अवघ्या अडीच तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
मुंबई-नाशिक मार्गावर प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रवाशांच्या सोईसाठी या मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या दृष्टाने रेल्वेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पूश-पूल तंत्रज्ञानाच्या मदतीने सीएसएमटी-हजरतनिजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस २ तास ३५ मिनिटांत नाशिक स्थानकात पोहोचते. यामुळे राजधानीच्या धर्तीवर राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेसही पूश-पूल पद्धतीने चालवण्याची मागणी खासदार हेमंत गोडस यांनी सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीदरम्यान केली.
राज्यराणी आणि पंचवटीच्या बँकर काढून पूश-पूश तंत्रज्ञानासाठी चाचपणी करण्यात येईल. यासाठी प्रथम बँकरचा खर्च आणि पूश-पूल तंत्रज्ञानाचा खर्च यांचा अभ्यास करण्यात येईल. यानंतर संबंधित मार्गासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्यात येतील. त्यानंतरच राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेस पूश-पूल पद्धतीने मार्गस्थ करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
सद्यस्थितीत मुंबई-नाशिक अंतर पार करण्यासाठी पंचवटी एक्स्प्रेसला ३ तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. तर राज्यराणी एक्स्प्रेसला हे अंतर पार करण्यासाठी साडेतीन तासांपेक्ष अधिक वेळ लागतो. पंचवटी एक्स्प्रेसची लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. पूश-पूलने राज्यराणी, पंचवटी मार्गस्थ केल्यास मुंबई, नाशिकसह मनमाड येथील प्रवाशांना देखील जलद आणि वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
.................................
विलंबास कारण...ठाणे-दिवा
मध्य रेल्वेवरील खासदार बैठकीत सर्व खासदारांनी 'रेल्वे विलंबाबाबत' विचारणा केली. याच बरोबर अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने त्याचा फटका रेल्वे फेऱ्यांना बसत आहे. सीएसएमटी ते ठाणे दरम्यान मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका आहे. मात्र ठाणे-दिवा दरम्यान उपनगरीय लोकल मार्गिकेतूनच मेल-एक्स्प्रेस धावत असल्याने त्याचा परिणाम लोकल वेळापत्रकावर होतो, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हा प्रकल्प लवकर पूर्ण करावा, अशी मागणी ठाण्यातील खासदारांकडून करण्यात आली.