अ‍ॅपशहर

'आंबेडकर भवन' गुंडांचा अड्डा बनले होते!

'दादरमधील आंबेडकर भवन हे बाबासाहेबांना सामाजिक केंद्र बनवायचे होते. मात्र, प्रकाश, आनंदराज व भीमराव आंबेडकर या तीन बंधूंनी तिथं गुंडांचा अड्डा बनवला होता,' असा घणाघाती आरोप माहिती आयुक्त व पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागर रत्नाकर गायकवाड यांनी केला आहे.

Maharashtra Times 29 Jun 2016, 11:54 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ratnakar gaikwad slams ambedkar brothers
'आंबेडकर भवन' गुंडांचा अड्डा बनले होते!


'दादरमधील आंबेडकर भवन हे बाबासाहेबांना सामाजिक केंद्र बनवायचे होते. मात्र, प्रकाश, आनंदराज आणि भीमराव आंबेडकर या तीन भावांनी तिथं गुंडांचा अड्डा बनवला होता,' असा घणाघाती आरोप माहिती आयुक्त आणि पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागर रत्नाकर गायकवाड यांनी केला आहे.

दादर येथील 'आंबेडकर भवन'ची इमारत पाडल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंबीय व पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टमध्ये वाद पेटला आहे. आंबेडकर कुटुंबीयांनी संबंधित ट्रस्टींवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आंबेडकरांचे नातू प्रकाश, आनंदराज व भीमराव यांच्यावर तोफ डागली. 'डॉ. आंबेडकर भवनावर या तिघांनी कब्जा केला होता. आंबेडकर बंधूंना दादरचा प्लॉट बळकावायचा होता. ते भवन चळवळीचे केंद्र राहिले नव्हते, तर तो गुंडाचा अड्डा झाला होता, असं गायकवाड म्हणाले. 'ट्रस्टींना इथं १७ मजली इमारत बांधून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ट्रस्टींनी हा निर्णय घेतल्यानंच आंबेडकर बंधूंच्या पोटात दुखत आहे. पण जीव गेला तरी चालेल हे स्वप्न आम्ही पूर्ण करणारच, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

हे भाडेकरू कसे?

आंबेडकर भवन गुपचूप पाडल्याचा आरोपही गायकवाड यांनी फेटाळून लावला. 'आम्ही भवन गुपचूप पाडले नाही. त्याबाबत नियमानुसार वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. महापालिकेनं भवनची इमारत धोकादायक असल्याची नोटीसही दिली होती. त्यामुळे ही वास्तू पाडणं ट्रस्टींचं कर्तव्य होतं. मात्र, ती पाडण्यास आंबेडकर बंधूंचा विरोध होता. या तिघांनी तिथं बेकायदा कार्यालयं थाटली होती. या नेत्यांनी आजपर्यंत एक रुपयाही भाडं दिलेला नाही, मग ते भाडेकरू कसे,' असा सवालही गायकवाड यांनी केला.

त्यांना मालकी हवी आहे!

पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने या प्रकरणी अनेकदा तोडग्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना ट्रस्टीचे अध्यक्षपद हवं आहे, तर इतर दोघा बंधूंना नव्या इमारतीत एक एक मजला मालकी हक्कानं हवा आहे. त्याला नकार देऊन ट्रस्टींमध्ये आंबेडकर कुटुंबीयांना घेऊ नये हे बाबासाहेबांचे धोरण आम्ही पुढे चालवत आहोत,' असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं. खुलासा गायकवाड यांनी केला.

हे राज्यघटनेवरही हक्क सांगतील!

हे तिघे बंधू बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रत्येक संस्थेवर आणि वास्तूंवर हक्क सांगत आहेत, असं सांगतानाच, 'उद्या हे आमच्या आजोबांनी देशाची राज्यघटना लिहिली आहे म्हणून राज्यघटनेवर सुद्धा हक्क सांगतील,' असा टोला गायकवाड यांनी सांगितला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज