म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा दारुण पराभव होण्यास जबाबदार असलेल्या मुद्यांची सखोल कारणमीमांसा करतानाच, राज्यात काँग्रेसपासून दलित व मुस्लिम समाजघटकांचा जनाधार तुटला आहे, हे मान्य करत आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पारंपारिक मतदार पुन्हा काँग्रेस महाआघाडीशी जोडला जाईल, असे प्रयत्न करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या दादरच्या टिळक भवनात झालेल्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी संघाच्या मुशीत घडलेल्या भाजप प्रणित एनडीएला बळ देण्याचे काम केल्याचे निकालावरुन सिद्ध झाले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा मनसुबा महाराष्ट्रातील जनतेसमोर उघड करणे आणि दलित व मुस्लिमांना पुन्हा सेक्युलर विचारसरणीच्या महाआघाडीसोबत जोडणे यासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मंत्री नसीम खान यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या यंत्रणेबाबत संशय असून, आगामी विधानसभा निवडणूक नेटाने लढण्याचे या बैठकीत ठरले.
प्रदेश काँग्रेस समितीने लोकसभा निकालांची कारणमीमांसा करण्यासाठी दादरच्या टिळक भवनात गुरुवारी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या परिश्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांनी राहून यापुढेही पक्षाचे नेतृत्व करावे, असा एकमुखी ठराव प्रदेश काँग्रेस आणि मुंबई विभागीय काँग्रेसने संमत केला आहे. या बैठकीस माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, डॉ, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, हर्षवर्धन पाटील, अरीफ नसीम खान आदी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात लोकसभेला पराभूत झालेल्या २७ उमेदवारांशी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत योग्य काम न केल्याच्या अनेक तक्रारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचल्या. चव्हाण यांनी त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससमोर आंबेडकर-ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे आव्हान असेल. त्यासाठी दलित व मुस्लिम मतदारांना पुन्हा काँग्रेसशी जोडण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. दुपारी प्रदेश समितीची स्वतंत्र बैठक झाली. त्या बैठकीत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडू नये, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला. या बैठकीत आगामी विधानसभेच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. येत्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. सोशल इंजिनयरिंगच्या माध्यमातून सर्व समाजातील तरुणांना व नवीन नेतृत्वाला संधी देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.