म. टा. प्रतिनिधी, मुंबई
ग्राहक व विकासकांमधील वाद सामंजस्याने मिटावेत, न्यायालयीन खटले टळावेत, या उद्देशाने महारेराने मुंबई व पुण्यात स्थापन केलेल्या सलोखा मंचांत गेल्या सहा महिन्यांत घर खरेदीदारांच्या ९० टक्क्यांहून अधिक तक्रारी परस्पर सामंजस्याने निकालात काढल्या आहेत. १३३ तक्रारींपैकी पैकी ११९ तक्रारींचे अशा पद्धतीने निराकरण करण्यात आले आहे.
मुंबई ग्राहक पंचायतीच्या सूचनेनुसार महारेराने मार्च महिन्यात मुंबईत १०, तर पुण्यात पाच सलोखा मंचांची स्थापना केली. गेल्या सहा महिन्यांत या सलोखा मंचांपुढे आलेल्या तक्रारी कोणत्याही प्रकारे कायद्याचा किस न पाडता दोन्ही पक्षांत सामंजस्य घडवून सोडवण्यात येत आहेत. मुंबई ग्राहक पंचायत व क्रेडाई, एमसीएचआय व नारेडको या विकासकांच्या संघटनांतील अग्रणींनी पुढाकार घेऊन ग्राहकांच्या तक्रार निवारणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. अनेक विकासकांना त्यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारी ग्राहकांना दिलासा देतील अशा पद्धतीने सोडवण्यास राजी केले.
सलोखा मंचात समझोता होऊन सुटलेल्या तक्रारींचे फायदे अनेक आहेत. या मंचावर ग्राहक व विकासक या दोन्ही बाजूच्या संघटनांचे प्रतिनिधी असल्याने तक्रारदार ग्राहक तसेच विकासक या दोघांनाही या मंचाबद्दल विश्वास वाटू लागला आहे. सर्व साधारणपणे दोन ते तीन बैठकीतच दोन्ही बाजूंमधे सामंजस्य घडवून आणण्यात मंचाच्या सदस्यांना यश मिळत आहे. यासाठी ग्राहकाला एक हजार रुपये शुल्क भरावे लागत आहे. त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही बाजूंमध्ये मंच सदस्यांच्या उपस्थितीत लेखी समझोता झाला असल्याने विकासक त्याविरुद्ध अपिलातही जाऊ शकत नाही. त्यामुळे अपिलात होणारा कालपव्यय व त्यासाठीचा खर्चही वाचतो. तसेच सलोखा मंचापुढे वकिलांना प्रवेश नसल्याने तक्रारदाराला आपली तक्रार मांडण्यासाठी वकिलावर खर्च करण्याची गरज नसते.
मुंबईतील १० सलोखा मंचांनी ७५ तक्रारींमध्ये यशस्वीरित्या समझोता घडवून आणला असून १२ तक्रारींमध्ये तोडगा निघाला नाही. पुण्यातील पाच सलोखा मंचांनी ४४ तक्रारींमध्ये समझोता घडवून आणला, तर केवळ २ तक्रारींचे निराकरण होऊ शकले नाही. अशा प्रकारे महारेराच्या मुंबई व पुण्यातील १५ सलोखा मंचांनी १३३ पैकी ११९ तक्रारी निकालात काढल्या आहेत.