म. टा. प्रतिनिधी, मुंबई
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली मागासवर्गीय शिक्षक भरती तत्काळ करण्याचे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी संबंधितांना दिले. याप्रश्नी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भरती कृती समितीने मुश्रीफ यांची भेट घेतली होती.
शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा होऊन मार्च २०१८ मध्ये निकालही लागला. त्यानंतर सहा महिन्यांनी सरकारच्या पवित्र पोर्टलवर नोंदणीही करण्यात आली. मागील सरकारच्या काळात ग्रामविकास खात्याच्या शिफारशीवरून शिक्षण खात्याने एका शासननिर्णयाद्वारे आठ हजारपैकी चार हजार जागा रद्द केल्या. या जागा भराव्यात म्हणून वारंवार आंदोलने करण्यात आली. तसेच मागील सरकारचे मंत्री, अधिकारी यांच्याशी चर्चाही झाल्या; परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे समितीने ११ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले. त्याची दखल घेऊन वाघमारे यांनी या आंदोलकांसह मुश्रीफ यांची भेट घेऊन मागासवर्गीय शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार शिक्षक भरतीचे आदेश देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती मुश्रीफ यांनी केली.