अ‍ॅपशहर

भावांवर काळाचा घाला

येत्या काही दिवसांमध्ये अरबाझ आणि शेहजाद या दोन्ही मुलांची शाळा सुरू होणार होती. ही दोन्ही मुले आणि त्यांची आई उत्तर प्रदेशातल्या गोंडा जिल्ह्यात परत जाण्याच्या बेतात होते.

महाराष्ट्र टाइम्स 18 Jul 2019, 4:00 am
- उत्तर प्रदेशातून आले होते मुंबईदर्शनसाठी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम relieve your brothers on time
भावांवर काळाचा घाला


- अल्माबानो तब्बल १७ तास होत्या ढिगाऱ्याखाली

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

येत्या काही दिवसांमध्ये अरबाझ आणि शेहजाद या दोन्ही मुलांची शाळा सुरू होणार होती. ही दोन्ही मुले आणि त्यांची आई उत्तर प्रदेशातल्या गोंडा जिल्ह्यात परत जाण्याच्या बेतात होते. मात्र त्याआधीच डोंगरी इमारत दुर्घटनेत सात वर्षांचा अरबाझ आणि आठ वर्षांचा शेहजाद यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून त्यांची आई अल्माबानो वाचली आहे. सतरा तास त्यांनी दिलेली झुंज बुधवारी यशस्वी झाली. मात्र त्यांनी आपल्या मुलांना आपल्या डोळ्यांसमोर मृत्यूच्या दाढेत जाताना पाहिले त्यामुळे त्यांच्या दुःखाला पारावार उरलेला नाही.

रशीद इद्रिसी मुंबईमध्ये कामानिमित्त राहतात, तर त्यांची पत्नी आणि दोन मुले उत्तर प्रदेशात. मुलांच्या शाळांना सुटी असल्याने ते तिघे मुंबईत आले होते. त्याचवेळी अल्मा यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. त्यांची दोन्ही मुले मुंबईमध्ये फिरत सुटीचा आनंद घेत होती. एकंदरीत कुटुंबाचे दिवस मजेत जात होते. त्यावेळी काळाने त्यांच्यावर झाडप घातली आणि दोन्ही मुलांनी त्यांच्यापासून कायमचे दूर नेले.

मंगळवारी डोंगरी परिसरात कोसळलेल्या इमारतीमध्ये रशीद यांचे घर होते. ते तिथे भाड्याने राहत होते. इमारत कोसळताना इद्रिसी कुटुंबीयांना जाणवली, ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यातून त्यांची सुटका व्हायला बुधवारची पहाट उजाडली. या काळामध्ये अल्मा यांनी कसाबसा तग धरला पण त्यांची दोन्ही मुले मृत्यूमुखी पडली. आठवड्याभरात ते गावी परतणार होते. सतरा तासांनंतर सुटका झालेल्या अल्माबानो यांना प्रचंड वेदना होताना त्यांच्या नातेवाईकांनी पाहिले. त्यांचे हुंदके आणि वेदनेतून येणाऱ्या किंचाळ्या त्यांच्या नातेवाईकांना सहन होत नव्हत्या. त्यातच आपली मुले गमावल्याची जाणीवही तीव्र होती. ऑक्सिजन मास्कच्या आडून त्या रडत-ओरडत होत्या. मात्र त्यांचे नातेवाईक हतबल होते.

इद्रिसी यांचे कुटुंबीय शोधपथकांना मुले सापडतील या आशेत मंगळवारी रात्रभर रुग्णालयातच थांबून होते. घटनास्थळी कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. ढिगाऱ्याखालून काढल्यावर मुलांना थेट रुग्णालयातच आणू, असे त्यांनी सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात सुखरूप पाहता येईल; या आशेवर ते बसून होते. मात्र सकाळी त्यांच्या हाती दोन्ही मुलांचे पार्थिवेच आली. मुलांच्या पार्थिवांचे शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्ही मृतदेह घेऊन रशीद लगेचच गावी गेल्याची माहिती त्यांचा भाऊ मोहम्मद नसीम यांनी दिली. त्यामुळे अल्मा यांना आपल्या मुलांना डोळेभरून शेवटचे पाहताही आलेले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज